सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 13 मार्च : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. या बदलाचा फटका नागरिकांना बसत आहे. सकाळी थंडी, दुपारी कडकडून ऊन तर कधी पाऊस पडत असल्यामुळे वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे. यामुळे राज्यात व्हायरलची साथ आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सर्दी, खोकला आणि ताप हे आजार नागरिकांमध्ये वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलाच्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी या संदर्भात छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयाच्या मेडिसिन विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर मीनाक्षी भट्टाचार्य यांनी महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
रुग्णांची गर्दी वाढली
वातावरणामध्ये होत असलेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप यासारख्या आजारांच प्रमाण वाढले आहे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप येण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सरकारी रुग्णालयाप्रमाणेच खाजगी रुग्णालयांमध्ये देखील रुग्णांची गर्दी वाढली आहे. यामध्ये सर्दी, ताप तर आहेच मात्र खोकला हा दहा ते पंधरा दिवस जात नसल्याचं दिसून येत आहे. घाटी रुग्णालयामध्ये येणारे 40 टक्के रुग्ण हे सर्दी, ताप खोकल्याचे असल्याचे मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
H3N2 पासून कसा बचाव करावा? IMA च्या माजी अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video
अशी घ्या काळजी
सर्दी, खोकला आणि ताप हे आजार वातावरणात होणाऱ्या बदलामुळे पसरत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे गरजेचे आहे. बाहेरून आल्यावर हात स्वच्छ धुवावे. यासोबतच दिवसभर गरम पाणी प्यावे. एक-दोन दिवसांमध्ये सर्दी, ताप आणि खोकल्याचे प्रमाण कमी होत नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार घ्यावेत. त्यामुळे हे आजार टाळता येऊ शकतात, असं मीनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati Sambhaji Nagar, Health, Local18