सुशील राऊत,प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 04 मार्च : मार्च महिन्याची सुरुवात होताच उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तापमान वाढले असून अनेक भागात उन्हाचा पारा चढलेला आहे. अशातच आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी हवामान केंद्र विभागाने एक चिंताजनक माहिती दिलेली आहे. हवामान केंद्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या गव्हाची काढणी सुरु असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सोबतच या पावसाचा इतर पिकांनाही फटका बसण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा कृषी हवामान केंद्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 5 व 6 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीसह बीड जिल्ह्यात वादळी वारा विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर दिनांक 7 व 8 मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विभागाकडून आवाहन
सर्व शेतकरी बांधवांनी काढणी केलेल्या पिकांचा (हरभरा, ज्वारी,गहू,मका,आद्रक,हळद ) ढीग मारून ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक वातावरण बघून काढणी केलेल्या पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकांची काढणी करून घ्यावी. तसेच पाऊस चालू असताना जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. शेतकऱ्यांनी घाबरू न जाता नियोजन केल्यास त्यांना अडचणी येणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र विभाग यांनी केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Aurangabad, Farmer, Local18, Marathwada