सुशील राऊत, प्रतिनिधी
छत्रपती संभाजी नगर, 28 फेब्रुवारी : गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याची मागणी होत होती. हा मुद्दा राजकारणाचा केंद्रबिंदू बनला होता. अखेर औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर असं नामांतर झालं. मात्र, या नामांतरानंतर सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक कागदपत्रांमध्ये काही बदल करावा लागेल का असा प्रश्न पडला आहे. या संदर्भात छत्रपती संभाजी नगर येथील विधी तज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख यांनी उत्तर दिले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना पडलेल्या प्रश्नाबाबत विधी तज्ञ ॲडव्होकेट राजेंद्र देशमुख सांगतात की, एखाद्या शहराच नामांतर तेंव्हाच होत जेव्हा राज्याकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जातो. केंद्र सरकार या प्रस्तावाला मंजुरी देतं. मंजुरीनंतर संबंधित शहराचे नामांतर होत असतं. शहराचे नामांतर झाल्यानंतर त्या शहरातील नागरिकांना त्यांच्या कागदपत्रांमध्ये देखील बदल करावा लागतो.
ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींमध्ये त्यांना त्यांच्या नवीन नावाचा उल्लेख करावा लागतो. यासाठी राज्य सरकार नागरिकांच्या कागदपत्रांची बदल करण्यासाठी प्रक्रिया राबवत असते. यासाठी राज्य सरकारकडून सुलभ प्रक्रिया राबवली जाईल, असं देशमुख सांगतात.
Aurangabad News : आता फुलशेतीवरही चायनीज आक्रमण! शेतकऱ्यांच्या टेन्शनमध्ये भर, Video
नामांतराचा मुद्दा गाजत होता
छत्रपती संभाजी नगर येथील सांस्कृतिक मैदान येथे 8 मे 1988 रोजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी औरंगाबाद शहराचे नाव संभाजी नगर करण्यात यावे अशी मागणी करत शिवसैनिकांना यापुढे औरंगाबादला संभाजी नगर म्हणण्याचे आदेशही दिले होते. तेव्हापासून औरंगाबाद शहराचा नामांतराचा मुद्दा गाजत होता. प्रत्येक निवडणुकीमध्ये हा मुद्दा केंद्रबिंदू ठरत होता. अखेर औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर असं करण्यात आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Local18