मुंबई, 6 जानेवारी: औरंगाबाद शहराचं नामकरण करण्यावरून आघाडीत बिघाडी होते का, अशी परिस्थिती आहे. शिवसेना पूर्वीपासूनच या शहराचा उल्लेख संभाजीनगर असा करत आली आहे. आता मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे आल्यानंतर या शहराचं अधिकृत नामांतर होईल, अशी शिवसैनिकांना अपेक्षा आहे. पण आघाडीतल्या काँग्रेसचा या नामांतराला विरोध आहे. तीन पक्षांचं सरकार येण्याआधी तयार केलेल्या किमान समान कार्यक्रमात नामांतराचा विषय होता की नव्हता यावरून खरं-खोटं झाला, आता मुख्यमंत्री कार्यालयातून प्रसारित केल्या जाणाऱ्या माहितीच्या पोस्टरवर चक्क काँग्रेसच्या मंत्र्यांचा फोटो आणि संभाजीनगर उल्लेख असं जाहीर झालं आहे. यावरून पुन्हा काँग्रेस- शिवसेनेत धुसफूस होणार का? अशी चर्चा आहे.
औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडून केली जात आहे. मात्र या मागणीला काँग्रेसने विरोध केल्यामुळे आता महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर आता शिवसेनेनं पुन्हा एकदा या नामांतराविषयी रोखठोक भूमिका मांडली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली असल्यानेच पुन्हा नामांतराच्या विषयाला हवा दिली जात आहे. नामांतरासाठी सरकारने नियुक्त केलेल्या समितीने नामांतराचा निर्णय घेतल्यास हा बदल होईल.
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर (CMO Maharashtra) काँग्रेसच्या मंत्र्याच्या फोटोसह औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून पुन्हा आघाडीचं अंतर्गत वातावरण तापणार का, अशी चर्चा होते आहे. CMO कडून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतले निर्णय जाहीर करण्यात आले आहेत. त्यात एक निर्णय औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयाविषयी आहे. या निर्णयाची माहिती देताना वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काँग्रेसच्या अमित देशमुखांचा फोटो लावण्यात आला आहे.
हे वाचा - पुण्याचं नामांतर 'जिजापूर' करा, औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यानंतर आता या मागणीला जोर
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय @AmitV_Deshmukh pic.twitter.com/LqkMo2uXgi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 6, 2021
या फोटोवरून आता नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तातडीने एक ट्वीट करत संभाजीनगरला असलेला विरोध जाहीर केला आहे. तीव्र शब्दात त्यांनी हा विरोध असा दर्शवला आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 6, 2021
नामांतर वादाचा इतिहास
शिवसेनेनी जून 1995 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगरपालिकेत नामांतराचा प्रस्ताव मांडला होता आणि पासही करून घेतला होता पण काँग्रेसच्या नगरसेवकाने त्याला विरोध करत पहिल्यांदा उच्च आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Congress, Maharashtra, Shiv sena