पंढरपूर, 22 जून: महाराष्ट्रात वारीला (Wari) खूप मोठी परंपरा आहे. आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आणि विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दरवर्षी पायी वारी करत असतात. मात्र, गेल्यावर्षीपासून करोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे वारी मर्यादित स्वरुपात होत आहे. यंदाही मर्यादित स्वरुपात वारीला परवानगी दिली आहे. त्यातच आता आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी (Curfew in Pandharpur) लागण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
आठ दिवस संचारबंदीची शक्यता
महाराष्ट्रात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे पुन्हा चिंता वाढली आहे. यामुळेच आषाढी वारी दरम्यान पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. पंढरपूर आणि आसपासच्या 10 गावांत संचारबंदी ठेवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. दिनांक 17 पासून ते 25 जुलैपर्यंत ठेवण्याचा प्रस्ताव पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी म्हटलं, "मागील वर्षी प्रमाणेच यावर्षी सुद्धा आषाढी वारी सोहळा अत्यंत मर्यादित स्वरूपात होणार आहे. या संदर्भात मंदिर समितीकडून, माझ्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. शासनाकडून यावर्षीची वारी कशी होणार याबाबत विस्तृत सूचना आल्या आहेत. त्यानुसार ठराविक भाविकांनाच पंढरपुरात प्रवेश दिला जाणार आहे. त्या व्यतिरिक्त इतरांनी गर्दी करु नये आणि कोविडचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी 144 अंतर्गत संचारबंदीचे आदेश काढण्यासंदर्भात आमच्याकडून विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. यानुसार पंढरपूर आणि आसपासची 10 गावांत संचारबंदी ठेवण्यासाठी आम्ही विनंती केली आहे. दिनांक 17 पासून ते 25 जुलैपर्यंत ठेवण्याचं म्हटलं आहे. त्यासोबतच चंद्रभागा पात्रातील स्नानाबाबत निर्बंधांविषयी आम्ही प्रस्ताव पाठवला आहे आणि लवकरच याबाबत आदेश पारित होणे अपेक्षित आहे."
सर्व भाविकांना विनंती करण्यात येत आहे की, वारीसाठी ठराविक व्यक्तींच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही परवानगी देण्यात येणार नाहीये. आषाढी वारी आणि कार्तिक वारी निमित्त जसा बंदोबस्त होता त्याप्रमाणेच यंदाही पोलीस बंदोबस्त असणार आहे.
यंदा मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 व उर्वरीत आठ सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे. याबाबत पंढरपूर येथील आषाढी वारीसंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
यंदाच्या आषाढी वारीचे आयोजन करताना कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने निमावलीत नमूद केले आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे 1.5 किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होऊन पैार्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा व विठ्ठल संतांच्या भेटीस गेल्यावर्षी प्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. तर ‘श्रीं’चे नित्योपचार परंपरेनुसार सुरू ठेवून आषाढी यात्रा कालावधीमध्ये भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येईल. तर संत भानुदास महाराज यांच्या पुण्यतिथीसाठी 2+2 असे एकूण चार व्यक्तींच्या उपस्थितीत सध्या पद्धतीने साजरा करण्यास व श्री. विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक 1-15 व्यक्तीसह साध्या पद्धतीने साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प. श्री. गुरुदास महाराज देगलूरकरांचे चक्रीभवनसाठी ह.भ.प. देगलूकर महाराज व अन्य चार व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. ह.भ.प.श्री.अंमळनेरकर व ह.भ.प.कुकुरमुंडेकर महाराज यांचे सोबत प्रत्येकी दोन व्यक्तींना वैद्यकीय तपासणीच्या अटींच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे.
महाद्वार काला उत्सवासाठी व श्री.संत नामदेव महाराज समाधी सोहळा 1+10 व्यक्तीसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकादशीच्या दिवशींच्या रथोत्सवासाठी रथाऐवजी मंदिराच्या स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी व मंदिर समितीचे पाच कर्मचारी असे 15 व्यक्तींसह सामाजिक अंतर राखून व योग्य ती खबरदारी घेऊन साजरा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वारकरी संख्येच्या निकषानुसार संतांच्या पादुका भेटीसाठी, मानाच्या पालखीसाठी 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. यावर्षी दोन बस व प्रत्येकी बसमध्ये 20 प्रमाणे 40 संख्या निश्चित केली आहे.गोपाळकालासाठी मानाच्या पालखी सोहळयाला 1+10 या प्रमाणात गोपाळपूर येथे भजन व कीर्तनास परवानगी देण्यात आली आहे.
संताचे नैवेद्य व पादुकासाठी यावर्षी दशमी ते पैार्णिमा असे 6 दिवस 2 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.श्री. विठ्ठलाची प्रक्षाळपूजा समिती सदस्य यांच्या हस्ते सपत्नीक 2+3 श्री.रूक्मीणी मातेची प्रक्षाळपूजा 2+3, श्री. विठ्ठलाकडे 11 पुजाऱ्यांकडून श्रीस रूद्राचा अभिषेक व श्री रूक्मिणिमातेस 11 पुजाऱ्यांकडून पवनमान अभिषेक करण्यास परवानगी देण्यात आली आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Pandharpur, Wari