विजय कमळे, प्रतिनिधी
जालना, 22 फेब्रुवारी : झी मराठीवरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग प्रदर्शित करू नये, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. अखेर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचं आश्वासन डॉ. अमोल कोल्हे यांनी दिलं आहे. अमोल कोल्हेंनी फोनवरून हे आश्वासन दिल्याचं अर्जुन खोतकरांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं आहे.
संभाजी महाराजांचा ज्या पद्धतीने छळ करून त्यांना यातना देण्यात आल्या त्या पाहणे आम्हाला शक्य होणार नाही. त्यामुऴे राज्यातील सामाजिक सलोखा बिघडू शकण्याची भीतीही अर्जुन खोतकरांनी व्यक्त केली होती.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता अखेरच्या टप्प्यात आहे. मालिकेत संभाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केल्याचे दाखवण्यात येत आहे. त्यानंतरची दृश्यं पाहमे मनाला पटणारं नाही, या मालिकेतील असे चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं खोतकरांनी सांगितलं होतं. त्यातच आता मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंनी संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग दाखवणार नसल्याचं आश्वासन खोतकरांना दिलं आहे.
एक प्रवास कधीच न विसरता येणारा...... pic.twitter.com/jrjgtZ9rVS
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 2, 2020
ही ऐतिहासिक मालिका स्वराज्यरक्षक संभाजी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मात्र ही मालिका राजकीय दबावामुळे बंद करण्यात येत असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत होत्या. मात्र या केवळ अफवा असून त्यावर विश्वास ठेवू नका असं ट्विट करत अमोल कोल्हेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका 25 सप्टेंबर 2017 पासून प्रदर्शित होत आहे. ही मालिका आता प्रत्येक घराघरात जाऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून पसंती दिली आहे. फेब्रुवारी महिन्यातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amol kolhe, Arjun khotkar, Sambhaji Maharaj, Swarajya rakshak sambhaji