अकोला : सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक (cotton crop) शेतकरी बोंड अळीच्या (Pink bond worm) प्रादुर्भावाने चिंतेत आहेत. यावेळी चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गात होती. परंतु, संपूर्ण कापूस पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी अगदी पेरणीपासूनच संकटांचा सामना करावा लागत आहेत. खरिपातील पिकांवर एकामागोमाग संकटे आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अतिवृष्टी, गोगलगाई आणि आता गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. सततच्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल असताना आता गुलाबी बोंड अळीच्या प्रकोपांचे संकट उभे झाले आहे. बोंड अळी पिकाच्या बुंध्यावर व पानांवर अंडी देते. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या उपजीविकेसाठी पिकांची पाने व बोंड कुरतडून खातात. त्यामुळे पिकाचे उत्पन्न कमी होते.
कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही
सततच्या पावसामुळे खरिपातील पिकांची वाढ खुंटली. मशागती अभावी म्हणावे तसे पिक बहरले नाही. बोगस बियाणामुळे सोयाबीन पिकात देखील घट झाली आहे. त्यातच आता पिकांवर बोंड आळीने हल्ला चढवला असून आळ्या उभे पिक फस्त करत आहेत. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. फवारणीसाठी शेतकऱ्यांना महागडी औषध खरेदी करावी लागत असून यासाठी शेतकऱ्यांना कर्ज काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. नापिकी, किडींचा प्रादुर्भाव, कर्ज यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या घटना समोर येत आहेत. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
हेही वाचा- यमराजाला शापमुक्त करणारे आशापूरक मंदिर, पाहा VIDEO
उभ्या पिकाचे नुकसान
दोन एकर शेतात कापूस पेरणी केली आहे. कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचे आक्रमण झाले आहे. उभ्या पिकाचे नुकसान होत असून यातून उत्पन्न घटणार आहे. यावर शासनाने उपाययोजना सांगून मार्गदर्शन करावे जेणेकरून शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट टळेल, अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी गोपाल खोपाले यांनी केली आहे.
हेही वाचा- खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट; सणाचा फायदा घेत दीडपट भाडेवाढ, पाहा VIDEO
शेतातील निरीक्षण वाढवावे
पीक व रोग सर्वेक्षण केले असता गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी उपाययोजना म्हणून शेतामधील निरीक्षण वाढवले पाहिजे, अळीचा प्रादुर्भाव असलेले बोंड नष्ट करून टाकावे, फेरोमेन ट्रैपचा वापर करावा, एकरी पाच फेरोमेन ट्रैप शेतकऱ्यांनी लावावे, कृक्रोमो फॉस, निंबोळी अर्क, 50 इसीये 10 लीटर पाण्यात मिक्स करून फवारणी करावी, अशी माहिती जिल्हा कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Farmer