अहमदनगर, 22 फेब्रुवारी : अहमदनगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची बदली झाल्यापासून अवैध व्यवसाय जोरात सुरू झाले असल्याच्या तक्रारीचा पाढा लोकप्रतिनिधींनी नियोजन बैठकीत मांडला आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. या बैठकीत आमदार आणि खासदार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते यांनी वाळू चोरांना पोलीस आणि महसूल अधिकार्यांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप केला आहे. खासदार, आमदारांकडून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत अधिकार्यांवर भर बैठकीत आरोप झाले. दोन्ही विभागातील अधिकारी यावर गप्प बसले.
अहमदनगर जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेवरच विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी बोट ठेवून जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सात तास बसून जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. छेरींग दोर्जे यांची ही बैठक म्हणजे जिल्ह्यातील अधिकायांना एकप्रकारे ‘अल्टिमेटम’ होता, असेही बोलले जात आहे.
छेरींग दोर्जे यांनी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत पोलिसांच्या कामगिरीशी निगडीत असलेल्या बहुतांशी गोष्टींचा आढावा घेतला. छेरींग दोर्जे यांच्या चौफेर आढाव्यामुळे जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बोलती बंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि त्याला पाठबळ देणारी पोलीस दलातील छुपी यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
जिल्ह्यात वाळू चोरांचे वाढलेले थैमान, वाढते अवैध धंदे, खून, अपहरण, जबरी लूट, गोळीबार, घरफोड्यांचे प्रमाण, कारागृहातून गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे पलायन, त्यांच्या शोधात जिल्हा पोलिसांना येत असलेले अपयश आदींचा आढावा छेरींग दोर्जे यांनी घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Ahmednagar news