जालना, 8 सप्टेंबर : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लहुजी शस्त्रसेनेच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयात खेकडे छोडो आंदोलन करण्यात आलं आहे. तसंच आता खेकडे सोडले आहेत, पण मागण्या मान्य न झाल्यास साप सोडण्याचा धमकीवजा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, एससी समाजाच्या 13 टक्के आरक्षणाचं अ,ब,क,ड असं वर्गीकरण करण्यात यावं, बार्टी संस्थेची चौकशी करण्यात यावी, खडकपुरा येथील मातंग समाज बांधवाच्या मृत्युप्रकरणी आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, जाफराबाद तालुक्यातील बोरखेडी येथील मातंग कुटुंबावर हल्ला करणाऱ्यावर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी लहुजी शस्त्रसेनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात खेकडे छोडो आंदोलन करण्यात आलं आहे.
हेही वाचा - हायवेवर ट्रकने दिली बाईकला जोरदार धडक, 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
दरम्यान, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभरातून निवेदन देण्यात येत आहे. याआधी अण्णाभाऊंवर प्रेम करणाऱ्या काही अनुयायांनी थेट रक्ताने पत्र लिहित याबाबतची मागणी केली होती. त्यामुळे आगामी काळात राज्य आणि केंद्र सरकार याबाबतची दखल घेणार का, हे पाहावं लागेल.