अहमदनगर, 16 मे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. मात्र अशा स्थितीतही काही लोक सरकारी आदेश धाब्यावर बसवत लपून-छपून प्रवास करत आहेत. मुंबईसारख्या रेड झोनमधून थेट अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरपर्यंत प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला मृत्यूनंतर कोरोना झाला असल्याचं समोर आलं आणि अख्खा तालुका हादरला आहे. कारण या व्यक्तीच्या संपर्कात 200 हून अधिक लोक आले होते.
मुंबईच्या घटाकोपरमधी एक व्यक्ती पारनेर तालुक्यातील आपल्या सासऱ्याच्या गावी गेला. लपून-छपून पारनेरमध्ये पोहोचलेला हा जावई एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने तिथं गेल्यानंतर अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. मात्र नंतर त्याची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. मात्र मृत्यूनंतर हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आणि गावातील लोकांमध्ये भीती पसरली. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 200 पेक्षा जास्त लोकांना आता क्वारन्टाइन करण्याची वेळ आली आहे. याबाबत 'टीव्ही9 मराठी'ने वृत्त दिलं आहे.
दरम्यान, नगर शहरातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची 22 वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील 20 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 62 झाली आहे.
नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील कापड बाजार, झेंडूगेट, ख्रिस्तगल्ली, पिंजर बेलदार सुभेदार, या भागात दुकाने पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
काय आहे नगरमधील स्थिती?
बाधित : 62 (1पुणे1मुंबई)=64
उपचारार्थी : 19
कोरोनामुक्त : 40
कोरोनामुळे मृत्यू : 04 (1पुणे)=5
देखरेखीखाली: 955
तपासणी: 1819
संकलन, संपादन - अक्षय शितोळे