आष्टी, 30 मे : मानसिक तणावातून 32 वर्षीय वनरक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बीडच्या आष्टी तालुक्यात ब्रह्मगाव येथे उघडकीस आली आहे. अनिल आबासाहेब जगताप असं आत्महत्या केलेल्या वनरक्षकाचं नाव आहे. अनिल जगताप हे आष्टी तालुक्यातील ब्रह्मगाव कार्यक्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत होते. मात्र त्यांनी आष्टी परिसरातील शृंगार देवी मंदिराच्या परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान मानसिक तणावातून जगताप यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आष्टी पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात मृत्यूची अकस्मात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कर्मचारी क्षीरसागर करत आहेत.
अनिल आबासाहेब जगताप हे मागच्या काही दिवसांपासून तणावग्रस्त होते. कुटुंबात अबोला धरून राहणे, तसेच कर्मचाऱ्यांना देखील बोलत नसत. त्यामुळे त्यांना कोणत्या गोष्टीचं टेन्शन होतं हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र तणावग्रस्त असल्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शी पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या घटनास्थळावर आत्महत्या केलेल्या ठिकाणी वडाच्या झाडाला गमजाणे गळफास घेतल्याचे दिसून आले. त्या ठिकाणी काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या, त्यामुळं आत्महत्या की हत्या असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. कमी वयात अनिल यांनी वन खात्यामध्ये चांगले काम केले होते. तसेच वनसंवर्धन यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका असायची. मात्र अशा तरूण वनरक्षकांने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हे ही वाचा-IDEO: उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, दगड मारून फोडली काच
आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. तसेच आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अनिल जगताप यांनी आत्महत्या का केली याचं खर सत्य पोलीस तपासात बाहेर येईल. मात्र तोपर्यंत हत्या की आत्महत्या हे गूढ कायम आहे. अनिलने एव्हडे टोकाचे पाऊल उचलण्यामागे कोणते कारण होते हा प्रश्न अद्याप तरी अधांतरीच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.