राहुल पाटील, प्रतिनिधी
पालघर, 06 डिसेंबर : पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. 2021-22 वर्षात तब्बल 294 बालमृत्यू आणि 20 माता मृत्यू तर 2022-23 मध्ये ऑक्टोबर पर्यंत 151 बालमृत्यू तर 7 माता मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. यातील सर्वाधिक बालमृत्यू हे जव्हार, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यातील आहेत. या आकडेवारीमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.
पालघर जिल्ह्यात अपुऱ्या असलेल्या आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या अभावामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने यापैकी बहुतांशी बालकांचा मृत्यू झाल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झालं आहे. त्यामुळे मुंबई , ठाणे आणि नाशिक या महानगरांलगत असलेल्या पालघरमध्ये आजही बाळ मृत्यू सारख्या गंभीर प्रश्नावर मात करण्यात प्रशासन आणि शासन हे दोन्हीही अपयशी ठरताना दिसून येत आहेत.
(दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळेना, नाराज आमदारांसाठी ठरला नवा प्लॅन ?)
तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बालमृत्यू, माता मृत्यू , बेरोजगारी, कुपोषण यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्ह्याच विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र आजही हे प्रश्न कायम असल्याचा या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण दुर्गम भागात आजही आरोग्य सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय. याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कारणांमुळे येथील बालकांना आणि गरोदर मातांना वेळेत उपचार न मिळाल्याने हे मृत्यू झाल्याचही उघड झालं आहे.
(महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात ठाकरे रस्त्यावर, महाविकासआघाडीचा विराट मोर्चा, तारीख-ठिकाण ठरलं!)
आदिवासी विकास विभाग आणि शासनाच्या इतर विभागांमार्फत याच ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था आणि इतर मूलभूत सोयी सुविधांसाठी वर्षाकाठी कोट्यावधी रुपये निधीही खर्च केला जातो. त्याचा गवगवा येथील लोकप्रतिनिधी नेहमीच करताना दिसून येतात. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असताना देखील आजही येथील दुर्गम भाग मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याने हा निधी नेमका जातो कुठे असा सवाल येथील स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पालघरच्या जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात मूलभूत सोयीसुविधांच्या विकास कामांमध्ये होणाऱ्या निधीतील अपहारांच्या आजपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र आजही सरकारकडून योग्य दखल घेऊन कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेले नाही. त्यामुळे येथील विकास कामांवर खर्च होणाऱ्या निधीचा योग्य फायदा येथील तळागाळातील नागरिकांना होताना दिसून येत नाही. आता समोर आलेल्या बालमृत्यू आणि माता मृत्यूच्या धक्कादायक आकडेवारी नंतर तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारला जाग येईल का हे येत्या काळातच स्पष्ट होईल.
पालघरमधील आतापर्यंत बाल मृत्यू
2014-15 बाल मृत्यू ( 626 )
2015-16 बाल मृत्यू (565 )
2016 -17 बास मृत्यू (557) माता मृत्यू (18 )
2017-18 बाल मृत्यू ( 469) माता मृत्यू ( 19)
2018-19 बाल मृत्यू ( 348 ) माता मृत्यू (13)
2019-20 बास मृत्यू ( 303 ) माता मृत्यू (10)
2020-21 बाल मृत्यू ( 296 ) माता मृत्यू (12)
2021-22 बाल मृत्यू ( 296 ) माता मृत्यू (20 )
2022-23(ऑक्टोबरपर्यंत ) बाल मृत्यू ( 151) माता मृत्यू (07 )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi news