मुंबई, 12 डिसेंबर : प्रवासात अनेकदा आपली घाई गडबड होते. विशेषत: ट्रेनचा (Train) प्रवास असेल तर चढताना, उतरताना हमखास गोंधळ होतो. अशावेळेस अनेकदा काही जणांचं सामानही ट्रेनमध्येच राहून जातं. काही वेळेस आपणच सामान ट्रेनमध्ये विसरतो. आता सामान परत मिळणार नाही असं आपल्याला वाटतं. पण सामान खरोखरंच परत मिळतं का आणि ते परत मिळवण्यासाठी काय करावं लागतं, याबद्दलची ही माहिती..
काहीवेळेस ट्रेन स्टेशनवर अगदी कमी वेळासाठी थांबतात. मग गडबडीत सामान घ्यायचं विसरलं जातं. एकदा ट्रेन पुढे गेली की मग आपल्याला आठवतं की आपलं सामान या गाडीत राहिलं आहे. हे सामान आता गेलं आणि परत कधीच मिळणार नाही असं आपल्याला वाटतं. पण थोडे प्रयत्न केले तर आपलं सामान आपल्याला परत मिळू शकतं, याबाबतचे वृत्त ‘टीव्ही9 भारतवर्ष’ने वृत्त दिलं आहे.
तुमचं सामान जर ट्रेनमध्येच राहिलं असेल तर तुम्ही ज्या स्टेशनवर आहात तिथल्या रेल्वे अधिकाऱ्यांबरोबरच तिथल्या आयपीएफ (IPF) पोलिसांनाही याबद्दलची माहिती द्या. तुम्ही आरपीएफमध्ये (RPF)याबद्द्ल एफआयआरही (FIR) नोंदवू शकता. म्हणजे, तुमचं सामान शोधणं ही रेल्वे आणि पोलिसांची (Police) जबाबदारी होते. जर तुम्ही सामान ट्रेनमध्येच विसरला असाल आणि त्याच जागेवर म्हणजेच तुम्ही सांगितलेल्या सीट नंबरवर जर तुमचं सामान सापडलं तर ते तिथल्या सगळ्यात जवळच्या आरपीएफ स्टेशनमध्ये जमा केलं जातं. अनेकदा जिथून तक्रार केली आहे त्या स्टेशनपर्यंतही हे सामान पोहोचवलं जातं.
कालीन भैयासोबत दिसला MS Dhoni, नव्या लूकची होतेय चर्चा, पाहा Photos
त्यानंतर प्रवासी आपली योग्य ती माहिती देऊन आणि ओळख पटवून हे सामान परत मिळवू शकतात. काही स्टेशन्सवर तर प्रवाशांच्या घरापर्यंतही सामान पोहोचवलं जाण्याची व्यवस्था केली जात आहे. तुम्ही योग्य त्या दिशेने प्रयत्न केल्यास ते परत मिळण्याची शक्यताही जास्त असते.
रेल्वे सामानाचं काय करते?
तुमचं सामान ट्रेनमध्ये राहिल्यास ते स्टेशनवर जमा केलं जातं. जर रेल्वे कर्मचारी किंवा एखाद्या प्रवाशानं सामान पाहून त्याबद्दल सांगितल्यास ते सामान स्टेशन मास्तर जमा करून घेतात. प्रत्येक सामानासाठी काही ठराविक प्रक्रिया आहे. म्हणजे, सामानात जर काही दागिने किंवा त्यासारख्या मौल्यवान वस्तू असतील तर ते सामान 24 तास रेल्वे स्टेशनवरच ठेवलं जातं. जर 24 तासांच्या आत या सामानावर कुणी हक्क सांगितला, कुणी दावा केला तर ते सामान त्यांना परत दिलं जातं. नाहीतर हे सामान पुढच्या झोनल ऑफिसमध्ये पाठवलं जातं.
पठ्ठ्याने तलावात मारली उडी पण तो नाही बुडाला, तर... LIVE VIDEO
तर अन्य सामानासाठी तीन महिन्यांचा वेळ असतो. रेल्वे अधिकारी हे सामान तीन महिने त्यांच्याजवळ ठेवतात आणि त्यानंतर ते पुढे पाठवलं जातं. काही सामान विकण्याबद्दलही नियम आहेत. अर्थात ती प्रक्रिया खूप मोठी आहे. प्रत्येक सामानासाठी वेगळे नियम आहेत. त्या नियमांनुसारच, हरवलेल्या किंवा विसरलेल्या या सामानाचं वर्गीकरण केलं जातं. ज्यांनी तक्रार केली आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं.
तेव्हा पुढच्या वेळेस तुमचं सामान ट्रेनमध्ये राहिलं ततर काळजी करु नका. तक्रार करा, रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि तुमचं सामान नक्की मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway