मुंबई, 28 नोव्हेंबर : वजन कमी करण्यामध्ये भारतीय अन्नपदार्थांना जास्त प्राधान्य दिले जात नाही. भारतीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट आणि चरबीचे प्रमाण जास्त असल्याने, डाएट आहारात भारतीय पदार्थांचा समावेश करत नाहीत. भात आणि चपाती हे भारतीय आहारातील प्रमुख खाद्यपदार्थ आहेत. यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते. याचबरोबर आमटीमध्ये देखील फॅट आधिक असतं.
या दोन्ही पदार्थांमुळे कॅलरी देखील मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे अनेकदा भारतीय अन्नपदार्थांचा डाएट आहारात समावेश करण्याकडे नागरिकांचा कल नसतो. असा आहार घेताना बहुतेक लोक ओट्स, दही, आणि सलाडसारखे पाश्चात्य पदार्थ पसंत करतात. परंतु भारतीय अन्न कसे तयार केले जाते किंवा किती प्रमाणात यामध्ये मसाल्यांचा वापर केला जातो ही मुख्य समस्या आहे.
खरी समस्या भारतीय अन्न पदार्थ नाही, तर ते तुम्ही कशाप्रकारे बनवले आहेत यावर अवलंबून असतं. तुम्ही योग्य पद्धतीने ते तयार केले आणि त्यामध्ये योग्य घटकांचा वापर केला तर नक्कीच भारतीय अन्न पदार्थ उत्तम आहेत.
हेल्दी फॅट -
कोणत्याही पदार्थामध्ये योग्य प्रमाणात मसाल्यांचा वापर केल्यास योग्य पद्धतीचे फॅट्स मिळतील. मोहरीचे तेल, नारळाचे तेल किंवा तूप योग्य प्रमाणात वापरा. तेलांचा जास्त वापर शरीराला हानी पोहोचवू शकतो आणि बर्याच आजारांना आमंत्रण देखील ठरू शकतो. त्यामुळे आहारामध्ये तेलाचा कमीतकमी वापर करावा.
मसाले -
भारतीय जेवणात मोठ्या प्रमाणात मसाल्यांचा वापर केला जातो. यामध्ये हळद, लवंग, मिरपूड, जिरे आणि मोहरी यांसारख्या मसाल्यांचा वापर केला जातो. मसाले केवळ पोषक द्रव्यच देत नाहीत तर याचा औषध म्हणून देखील वापर केला जातो. या मसाल्यांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात जे घातक आजारांना प्रतिबंध करतात. हे आपल्याला बर्याच काळासाठी निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील अशुद्धता काढून टाकून वजन कमी करण्याच्या प्रक्रियेस वेगवान करण्यास आणि शरीरातील पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत करतात.
पौष्टिक न्यूट्रिशियस धान्य -
गव्हाबरोबरच बाजरी, नाचणी आणि ज्वारीसारख्या पदार्थांपासून देखील चपात्या तयार करू शकता. जास्त कार्बोहायड्रेट असलेल्या गव्हापासून स्वतःला याच्या मदतीने दूर ठेवू शकता. या संपूर्ण धान्यापासून बनवलेल्या चपातीमध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियमसह पोषकतत्त्वं असतात.
पॅक खाद्यपदार्थ खाऊ नका -
भारतीय पदार्थ घरी ताजे बनवले असतात. त्यामुळे ते आरोग्याला अतिशय पोषक असतात. ताजं बनवलेली आमटी आणि चपाती पौष्टिक असते. त्यामुळे घरी तयार केलेले अन्न हे नेहमी पॅकेटमधील अन्नापेक्षा कधीही चांगले आहे. त्याचबरोबर वजन कमी करण्यातदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडते. पॅकेटमधील जेवणाने वजन वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.
वैविध्य असणारे पदार्थ -
विविध प्रकारचे पदार्थ आणि जेवण करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे एकाच प्रकारचे जेवण करण्याचा कंटाळा येणार नाही. भारतामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असून पोहे, इडली, साबुदाणा खिचडी, उपमा आणि शिरा यांसारखे अनेक पदार्थ आहेत. या पदार्थांच्या मदतीने तुमचे वजन कमी करू शकता.