मुंबई, 31 जानेवारी : जीवन जगण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. पाण्याशिवाय सजीवांच्या जीवनाची कल्पनाच करता येत नाही. आपण जितकं जास्त पाणी पिऊ तितके जास्त फायदे आपल्या आरोग्याला मिळतात. विशेषत: उन्हाळ्यात जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा धोका वाढतो. WebMD मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, उन्हाळ्यात डिहायड्रेशन ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे उलट्या, जुलाब आणि डायरिया होतो. डिहायड्रेशन होण्याआधीच आपलं शरीर पाण्याच्या कमतरतेचे संकेत देत असतं. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास पुढील लक्षणं जाणवतात.
1. त्वचा कोरडी होणं : शरीरात पाण्याची कमतरता असल्यास त्वचेवर कोरडेपणा येऊ लागतो. त्यामुळे त्वचेवर पुरळ येणं, खाज सुटणं आणि ओठांवर डेड स्कीन जमा होते. अनेक वेळा त्यातून रक्तही येतं.
2. युरिनशी संबंधित समस्या: जर तुमच्या लघवीचा रंग फिका आणि पारदर्शक असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता नाही. पण, जर लघवीचा रंग गडद किंवा पिवळा असेल तर शरीरात पाण्याची कमतरता आहे. या शिवाय डिहायड्रेशन झाल्यास लघवीचं प्रमाण कमी होतं आणि मूत्रमार्गात जळजळ होण्याची समस्या उद्भवू शकते. ही सर्व लक्षणं तुमच्या शरीरात असलेली पाण्याची कमतरता दर्शवतात. तुम्हालाही ही लक्षणं दिसली तर तुम्ही जास्त पाणी पिण्यास सुरूवात केली पाहिजे.
3. श्वासाची दुर्गंधी: शरीरात पाण्याची कमतरता असल्यास तोंड आणि घशात कोरडेपणा येतो. त्यामुळे श्वास घेण्याच्या समस्येसोबतच तोंडातून दुर्गंधीही येऊ लागते.
4. तहान-भूक वाढणं: शरीरात पाण्याची कमतरता असल्यास, पाणी प्यायलं तरी पुन्हापुन्हा तहान लागते. यासोबतच भूकही वाढते. अचानक वाढलेली भूक हेदेखील शरीरातील पाण्याच्या कमतरतेचं लक्षण आहे.
5. थकवा येणं: शरीरात पाण्याची कमतरता असेल तर थकवा जाणवू लागतो. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तदाब कमी होणं, थकवा येणं, डोकेदुखी, अस्वस्थता आणि जास्त झोप येणं असे त्रास होतात. भरपूर पाणी प्यायल्यानं हा त्रास नाहीसा होऊ शकतो.
6. मानसिक थकवा: पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरासोबत आपल्या मनावरही परिणाम होतो. पाण्याची कमतरता असल्यास मानसिक थकवा येतो आणि शरीरातील ऊर्जा पातळीही कमी होऊ लागते. तुम्हालाही ही लक्षणं दिसली तर जास्त पाणी पिण्यास सुरू करावी.
नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी वास्तूचा सोपा उपाय, कापूरही सोडवू शकतो समस्या
थंड पाणी पिणे टाळा
आपल्या शरीराला पाण्याची आवश्यकता असली तरी मोठ्या प्रमाणात एकदम थंडगार पाणी पिणं टाळलं पाहिजे. कारण, एकदम थंड पाणी प्यायल्यानं तुमच्या आरोग्याला दीर्घकालीन हानी पोहोचू शकते. जर आपण बर्फाच्या तपमानाच्या जवळपास तापमान असलेलं पाणी किंवा चार अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेलं पाणी प्यायलं तर आपल्या शरीराला अंतर्गत तापमान 37 अंश सेल्सिअस राखण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. त्यामुळे आपण आरोग्याच्या कोणत्याही समस्या टाळण्यासाठी सामान्य तापमान असलेलं पाणी प्यायलं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Water