मुंबई, 13 डिसेंबर: कोरोना (Corona) काळामध्ये आपण सगळेच ताणतणावाला सामोरे जात आहोत. आरोग्याचं संकट, पैशांची चिंता यामुळे नातेसंबंधांवर परिणाम होत आहे. कोरोना काळात ब्रेकअप्स आणि घटस्फोटांचं प्रमाणही वाढलं आहे. ज्या जोडप्यांनी कधीही वेगळं होण्याचा साधा विचारंही केला नव्हता ती आता घटस्फोट घेऊन वेगळी रहायला लागली आहेत. लॉकडाऊनच्या काळापासून घटस्फोट घेणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण वाढलं आहे.
दिवसातले 24 तास एकमेकांसोबत घालवणं लॉकडाऊनच्या सुरुवातीला काही जोडप्यांना सुखद वाटत होतं. पण आता मात्र त्यांना या सगळ्याचा अधिक मानसिक त्रास होऊ लागला आहे. हे झालं लग्न झालेल्या लोकांचं पण लाँग डिस्टन्स रिलेशनमध्ये असलेल्या बऱ्याच कपल्सना एकमेंकांना भेटता येत नाही. त्यामुळे त्यांच्यातला संवाद कमी होत चालला आहे. गैरसमज वाढत चालले आहेत. कोरोना काळातली वाढलेली तूतू-मैमैं कमी करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी अगदी साध्या टिप्स घेऊन आलो आहोत.
संशयी वृत्ती कमी करा
तुमचा पार्टनर मोबाईल किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ घालवत असेल तर अनेकांच्या मनात संशय निर्माण होतं. खरं काय हे जाणून घेण्याआधीच आपण आपल्याच विचारांवर विश्वास ठेऊन समोरच्या व्यक्तीला त्याच चश्म्यातून पाहायला लागतो. हे करण्यापेक्षा तुमच्या मनात संशय निर्माण होत असेल तर पार्टनरशी संवाद साधा आणि खरं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा.
मी पणा सोडा
काही जणांना मी म्हणीन तेच खरं असं वागण्याची सवय असते. यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असते.आपले म्हणणे पुढे रेटण्यापेक्षा आपले विचार आणि समोरच्याचे विचार यातून सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न करा.
प्रेम व्यक्त करा
कधीतरी स्वतःहून आपल्या साथीदारासाठी काहीतरी प्लॅन करायला हवे. महिन्यातून एखादा चित्रपट,आठवड्यातून एखादवेळी सरप्राईज डिनर,अनपेक्षित दिलेली एखादी भेटवस्तू, दिसण्याचे केलेले कौतुक या आणि अशाच काही गोष्टी नातं टवटवीत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.
एक्सला मध्ये आणू नका
लग्नापूर्वी जर त्याचे किंवा तिचे कुणाशी प्रेमसंबंध असतील तर लग्नानंतर ते कटाक्षाने टाळावेत. जर त्याबाबत तुमच्या साथीदाराला माहिती असेल व काही हरकत नसेल तर निर्मळ मैत्री ठेवता येईल. पण त्यापुढे जाऊन मर्यादा सोडून वागू नका.
जुने वाद उकरुन काढू नका
लॉकडाऊन आधी पती-पत्नीना एकमेकांशी बोलायला वेळ नव्हता. पण आता एकत्र असल्यामुळे जुने वाद उकरून त्यावर भांडणं व्हायला लागली आहेत. पण असं करण्यापेक्षा भूतकाळाला मागे सोडा. तुमचा वर्तमान आणि भविष्याचा विचार करा.