मुंबई, 19 ऑक्टोबर : मानवाच्या आत्म्याचं वजन किती? एकदा मृत्यू झालेली व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकते का? मृत्यूनंतर माणूस कुठे जातो? त्याचा आत्मा कुठे जातो? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात; पण त्याची उत्तर मिळतीलच असं नाही. अशाच काही घटनांबद्दल वैज्ञानिकांनी प्रयोग व संशोधनं केली होती. काही प्रयोग रोखण्यासाठी सरकारला हस्तक्षेप करावा लागला होता, अशाच काही घटनांबद्दल जाणून घेऊयात.
आत्म्याचं वजन किती?
अमेरिकेत 1907 मध्ये डॉ. डंकन मॅकडोगल यांनी आत्म्याचं वजन मोजण्यासाठी प्रयोग केला. त्यांनी मरणासन्न अवस्थेतील 6 रुग्णांची निवड केली, सर्वांचं आधी वजन करण्यात आलं व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं वजन मोजण्यात आलं. मानवाच्या मृत्यूनंतर आत्मा शरीरातून बाहेर पडतो, असं म्हटलं जातं, त्यामुळे डॉक्टरांनी हा प्रयोग करायचं ठरवलं. मृत्यूनंतरचं वजन आधीच्या वजनातून वजा केल्यास आत्म्याच्या वजनाबद्दल माहिती मिळेल असा त्यांचा हेतू होता. पहिल्या रुग्णाचं वजन 21 ग्रॅम कमी भरलं, पण नंतर पूर्ववत झालं. दुसऱ्या दोन रुग्णांचं वजन आधी कमी झालं, पण नंतर वाढलं. एकाचा मृत्यू वजनाआधीच झाला, तर शेवटच्या रुग्णाच्या वजनात मृत्यूनंतर कोणताच बदल झाला नाही, पण एका मिनिटाने त्याचं वजन 28 ग्रॅम कमी झालं. अशा विविधांगी उत्तरांमध्ये डॉक्टरला आत्म्याच्या व त्याच्या वजनाचा शोध घेता आला नाही. मृताच्या शरीरातील बदलामुळे वजन कमी जास्त होत असल्याचं नंतर उघड झालं, पण याबद्दल सरकारला माहिती मिळाल्यानंतर हा प्रयोग थांबवण्यात आला होता.
मृताला जिवंत करण्याचा प्रयोग
अमेरिकेत 1934 साली मृत व्यक्तीला जिवंत करण्याचा प्रयोग डॉ. रॉबर्ड ई कोर्निश यांनी केला होता. मृत्यूनंतर व्यक्तीच्या शरीरारात रक्ताचा प्रवाह सुरू केल्यास ती पुन्हा जिवंत होऊ शकते, असा त्यांचा दावा होता. या प्रयोगासाठी काही रुग्णांची निवड करून त्यांनी टीटरबोर्डसह काही उपकरणांची मदत घेतली. मृताच्या शरीरात रक्तप्रवाह सुरू करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला, मेडिकल प्रक्रिया केल्या, पण त्यांना यश आलं नाही. नंतर त्यांनी हा प्रयोग जनावरांवर करायचं ठरवलं. मे 1934 मध्ये त्यांनी पाच श्वानांचा वापर केला. त्यांचं नाव लॅजरस I,II,III,IV व V ठेवलं. सर्व श्वानांना नॉयट्रोजन गॅस मिक्स्चर देऊन मारलं नंतर त्यांच्या शरीराला टीटरबोर्डशी बांधलं. पुढे एड्रेनालाईन मिक्स असलेलं इंजेक्शन त्यांना देऊन मशीनच्या मदतीने ऑक्सिजन देण्यात आला. शरीरात औषध पोहोचावं, यासाठी टीटरबोर्ड हलवण्यात येत होतं. या प्रयोगाने दोन श्वान जिवंत झाले पण तिघांवर हा प्रयोग अयशस्वी ठरला. नंतर अमेरिकन सरकारने या प्रयोगावर बंदी घातली. मृत शरीरावर असे प्रयोग करणं अनैतिक असल्याचं कारण सरकारने बंदी घालताना दिलं. त्यानंतर 1940 मध्ये असाच प्रयोग रशियात झाला. इथेही संशोधकांनी श्वानाला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रयोगात श्वानाचं शीर धडापासून वेगळं केलं, नंतर त्यांना जिवंत करण्यासाठी ऑटोजेक्टर मशीनच्या मदतीने नसांमध्ये रक्तपुरवठा केला. यानंतर श्वानाने हालचाल केली होती, पण सरकारने जनावरांशी क्रूरता असल्याचं म्हणत या प्रयोगावर बंदी घातली.
वाचा - रिक्षा-टॅक्सीवाल्यानं भाडे नाकारलं, कॅब ड्रायव्हरने राइड रद्द केल्यास काय करायचं
मानसिक प्रयोग
1963 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ स्टॅनले मिलग्राम यांनीही मानवांवर एक प्रयोग केला. त्यांना एखाद्या व्यक्तीची त्याच्या बॉस किंवा उच्च अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन करण्याची इच्छा मोजायची होती. हिटलरच्या आदेशानुसार त्याच्या लोकांनी छावण्यांमध्ये वर्षानुवर्षे लोकांचा कसा छळ केला, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. हा एक मानसशास्त्रीय प्रयोग होता. त्यांनी दोघांना दोन खोल्यांमध्ये ठेवलं. त्यापैकी एक शिक्षक होता आणि एक विद्यार्थी होता. दोघं एकमेकांचं बोलणं ऐकू शकत होते, पण पाहू शकत नव्हते. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्याला काही प्रश्न विचारायचे आणि चुकीचं उत्तर असल्यास विद्यार्थ्याला विजेचा शॉक बसायचा. आपल्याबरोबर क्रूर वर्तणूक केली जाऊ नये, यासाठी लोक आज्ञेचं पालन करत असल्याचं या प्रयोगातून समोर आलं. या प्रयोगाला लोकांनी विरोध केल्यानंतर त्यावर बंदी घातली गेली.
जुळ्या मुलांवर प्रयोग
दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही हादरवून सोडणारे अनेक प्रयोग केले गेले. ‘एंजेल ऑफ डेथ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. जोसेफ मेंगेले नावाच्या व्यक्तीने त्या वेळी जुळ्या मुलांवर एक धोकादायक प्रयोग केला होता. जेव्हा नवीन कैद्यांना मेंगलेकडे आणलं जायचं, तेव्हा तो बारकाईने सर्वांना बघायचा. त्याला जुळ्या मुलांवर प्रयोग करायला खूप आवडायचं. अशी मुलं दिसताच तो त्यांना कंबरेपासून एकमेकांना जोडून घ्यायचा. नंतर एकाच्या डोळ्यात डाय टाकून दुसऱ्याला त्रास होतो नाही ते बघायचा. त्याने जुळ्या मुलांचे गुप्तांग, कान, डोळे एकमेकांना लावून क्रूर प्रयोग केले होते. या प्रयोगामुळे मुलांना गॅंगरीन नावाचा आजार होऊन त्यांचा मृत्यू व्हायचा. एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तो दुसऱ्यालाही मारून टाकायचा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.