मुंबई, 03 जून: बॉलिवूडनी भारताला अनेक जोडपी दिली त्यापैकी काही ऑनस्क्रिन तर काही ऑफ स्क्रीन. अनेक हिरो-हिरोइनच्या जोड्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आणि निर्मात्यांना प्रचंड पैसे मिळवून दिले पण खऱ्या आयुष्यात त्यांनी लग्न केलं नाही. अर्थात तसं व्हावच असा काही नियम नाही पण काही हिरो-हिरोइनची पडद्यावरची जोडी इतकी जबरदस्त जमली की त्यांनी खऱ्या आयुष्यातही लग्न करून संसार थाटला. असंच पॉवर कपल म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी-बच्चन (Anniversary special). या जोडीनी हिट हिंदी चित्रपट तर दिलेच पण त्यांनी संसारातील सर्व महत्त्वाच्या प्रसंग अगदी उत्तम पद्धतीने पार पाडले. आज 3 जूनला ही जोडी आपला 48 वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या या मॅरेज अनिव्हर्सरीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला आज त्यांच्या लग्नाआधीचा किस्सा सांगणार आहोत जो तुम्हाला माहित नसेल. हा किस्सा रंजक आहे.
त्याचं असं झालं. अमिताभ बच्चन हिंदी इंडस्ट्रीत आले होते पण त्यांचा चित्रपट हिट झालेला नव्हता. त्यामुळे ते प्रसिद्ध होते. पण हिट सिनेमाच्या प्रतीक्षेत होते. जया भादुरी मात्र त्यावेळी स्टार हिरोइन होत्या. अमिताभ (Amitabh Jaya Bhaduri Bachchan) यांच्यापेक्षा वरच स्थान त्यांना इंडस्ट्रीत होतं. ही गोष्ट आहे 1973 सालातली. 11 मे 1973 ला प्रकाश मेहरा दिग्दर्शित जंजीर सिनेमा रिलीज झाला. सलीम जावेद यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली होती. हा चित्रपट जबरदस्त चालला आणि अमिताभ बच्चन स्टार झाले. त्यामुळे जंजीरची सगळी टीमच आनंदात होती. याबद्दलचं वृत्त बॉलिवूडलाइफ डॉट कॉमनं दिलं आहे.
View this post on Instagram
जंजीरमध्ये अमिताभ बच्चन, जया भादुरी आणि प्राण यांनी अभिनय केला होता. या सिनेमाच्या सेट्सवरच अमिताभ-जया यांच्या प्रेमाबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. वृत्तपत्रात सगळीकडे या दोघांच्या प्रेमाचे किस्से छापून येत होते. चित्रपट हिट झाल्यामुळे तर या चर्चांना उधाणच आलं. जंजीरचं यश साजरं करण्यासाठी मित्रमंडळींसह लंडनला एक जोरदार पार्टी करण्याचं ठरलं.
लंडनच्या या पार्टीबद्दल अमिताभ बच्चन यांनी त्यांचे वडिल प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांना सांगितलं तेव्हा त्यांनी विचारलं जया बरोबर येणार आहे का? अमिताभ यांनी होकारार्थी उत्तर दिलं. अमिताभ-जया यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलच्या चर्चा हरिवंशरायांच्या कानावर आल्याच होत्या. त्यामुळे त्यांनी एक अट घातली. लंडनला पार्टीला जाण्यापूर्वी अमिताभ आणि जयानी लग्न करायचं. मग काय? ते दोघं तयारच होते. लंडनला जाण्यापूर्वी सगळी तयारी करण्यात आली. मुंबईतल्या मलबार हिल परिसरात जयाची मैत्रीण राहत होती तिच्या घरी 3 जून 1973 ला लग्न करायचं ठरलं. अगदी छोटेखानी साध्या समारंभात अमिताभ आणि जया विवाहबंधनात अडकली. त्यानंतरच मिस्टर अँड मिसेस बच्चन लंडनला जंजीरच्या यशाची पार्टी आणि हनीमून साजरा करायला गेले.
View this post on Instagram
त्या दिवशीच्या आठवणी बच्चन यांनी एकदा आपल्या ब्लॉगमध्ये लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलं होतं, ‘मी लग्नासाठीचा पारंपरिक भारतीय वेषात तयार होतो. लग्नाला मलबार हिलला जाण्यासाठी मी गाडी चालवणार होतो. तर माझा ड्रायव्हर नागेश मला म्हणाला पारंपरिक लग्नात वर घोडीवर बसून जातो त्याचपद्धतीने मी कार चालवून तुम्हाला घेऊन जातो. जेव्हीपीडी स्कीममधल्या 7 व्या रोडवरील मंगल नावाचा बंगला सजून आमची वाट पाहत होता. आमचे शेजारी आले आणि त्यांनी लग्नासाठी निघा असं सांगितलं. इतक्यात पाऊस सुरू झाला जणू तो शुभशकुनच होता. मी निघालो. काही तासांत लग्नाचे विधी झाले आणि आम्ही श्री. व सौ. झालो होतो.’ पिंकव्हिला डॉटकॉमने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अमिताभ आणि जया बच्चन यांना लग्नवाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.