16 नोव्हेंबर : लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे लाडके अभिनेत अमिताभ बच्चन हे एका कार दुर्घटनेत अगदी थोडक्याच बचावले आहेत. मागच्या आठवड्यात ते कोलकत्त्यात होते आणि प्रवास करत असताना अचानक मर्सिडिज कारचं शेवटचं चाक गाडीपासून वेगळं झालं. पण सुदैवाने या अपघातात बिग बी तर बचावलेच पण इतरांनाही इजा झाली नाही.
या प्रकरणी, ज्या ट्रॅव्हल एजन्सीने मर्सिडिज कार बच्चन यांच्यासाठी उपल्बध केली होती त्या एजन्सीला पश्चिम बंगाल राज्य सरकारने कारण दाखवा नोटीस पाठवली आहे.
खरं तर बिग बी 23व्या कोलकात्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनासाठी गेले होते. या कार्यक्रमानंतर ते शनिवारी सकाळी विमानतळावर जाण्यासाठी निघाले आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला. बंगाल सचिवालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, 'जेव्हा शनिवारी म्हणजेच 11 नोव्हेंबरला बिग बी मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर जात होते तेव्हा डुफ्फेरिन रोडवर त्यांच्या मर्सिडिज कारचं मागचं चाक गाडीपासून वेगळं झालं आणि ड्राइव्हरचा गाडीवरून ताबा सुटला, पण यात सुदैवाने बिग बींना काहीही झालं नाही.
ही गाडी एका ट्रॅव्हल एजन्सीकडून बिग बींसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांना आता यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. गंभीर म्हणजे बऱ्याच दिवसांपासून या कारची सर्विसिंग केली नसल्याने गाडीत अनेक दोष होते. कंपनीने याची दखल न घेता त्या गाडीचा रोज वापर केला जात होता. त्यामुळे कंपनीच्या या हलगर्जीपणामुळे हा कार अपघात झाला असंच म्हणावं लागेल.
आता त्या कंपनीवर काय ती कारवाई होईलच, पण या सगळ्यात बिग बी बचावले हेच महत्त्वाचं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा