मुंबई, 6 जुलै: 'ट्रॅजेडी किंग' म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचं हिंदी चित्रपटसृष्टीतलं योगदान महत्त्वाचं आहे. वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले दिलीपकुमार त्यांची लव्ह लाइफ आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींमुळे चर्चेत राहिले आहेत. दिलीपकुमार आणि मधुबाला (Madhubala) यांची प्रेमकहाणी तर त्या काळात चित्रपटसृष्टीत सर्वांत गाजली होती. ऑनस्क्रीन प्रेमकहाणी खरोखरच्या आयुष्यात कधी आली, ते त्या दोघांनाही कळलं नाही. ती दोघं तब्बल 9 वर्षं एकमेकांच्या प्रेमात होती.
मधुबाला आणि दिलीपकुमार यांची जोडी लोकांनाही खऱ्याखुऱ्या आयुष्यात पाहायची होती. त्यांचं प्रेम पाहून सर्वांना ती गोष्ट प्रत्यक्षात येईल, असंही वाटत होतं; मात्र तसं झालं नाही. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते, नऊ वर्षं एकमेकांसोबत होते; पण केवळ एका हट्टामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नया दौर’ या चित्रपटाचं शूटिंग ग्वाल्हेरमध्ये सुरू होती. त्या वेळी काही गुंडांनी महिलांसोबत गैरवर्तन केलं. त्यामुळे मधुबाला यांचे वडील चिंतातुर झाले आणि त्यांनी शूटिंगचं ठिकाण बदलण्याची मागणी केली; मात्र दिलीपकुमार आणि चित्रपटाचे दिग्दर्शक यासाठी तयार झाले नाहीत. अखेर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. कोर्टात दिलीपकुमार यांनी दिग्दर्शकाला पाठिंबा दिला आणि मधुबाला यांचे वडील हट्ट करत असल्याचं सांगितलं. इथेच या दोघांच्या नात्यात ठिणगी पडली.
(हे वाचा: उंदरांनाही लागली दारूची चटक? दुकानातील 12 बाटल्या केल्या रिकाम्या अन्...)
एकदा दिलीपकुमार यांनी याबाबत खुलासाही केला. तेव्हा त्यांनी मधुबाला यांच्या वडिलांवर गंभीर आरोप केले. मधुबाला यांच्या वडिलांनी लग्नाला सौदा समजल्याचा आरोप दिलीपकुमार यांनी केल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं होतं. मधुबाला यांच्या वडिलांच्या हस्तक्षेपामुळे मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्या नात्यात दुरावा आला. तो दुरावा इतका होता, की सोबत काम करतानाही ते एकमेकांशी बोलतदेखील नव्हते. दिलीपकुमार यांनी एकदा त्यांच्या वडिलांची माफी मागावी, असं मधुबाला यांना वाटत होतं; पण तसं झालं नाही.
(हे वाचा:अजगरानं गिळलं कुत्र्याचं पिल्लू, थोड्या वेळाने झाली 'अशी' अवस्था )
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मधुबाला यांची बहीण मधुर यांनी सांगितलं होतं, की 'दिलीपकुमार आणि मधुबाला या दोघांचा साखरपुडाही झाला होता. दिलीपकुमार मधुबाला यांना म्हणाले होते, की 'तू तुझ्या वडिलांना अंतर दिलंस, तर मी तुझ्याशी लग्न करीन.' यावर मधुबाला यांनी म्हटलं होतं, की 'तू माझ्या वडिलांची माफी मागितलीस, तर मी तुझ्याशी लग्न करीन;' मात्र दोघांपैकी कुणीच माघार घेतली नाही आणि त्यांच्या प्रेमाचा अंत झाला.'
जेव्हा दिलीपकुमार आपल्याशी लग्न करणार नाहीत, याबद्दल मधुबाला यांची खात्री पटली, तेव्हा त्यांनी किशोरकुमार यांच्याकडून आलेला लग्नाचा प्रस्ताव स्वीकारला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Dilip kumar