मुंबई, 31 मार्च- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी भलेही आज या जगात नसतील पण आपल्या दमदार अभिनयामुळे ते आजही सिनेरसिकांच्या हृदयात जिवंत आहेत. अमरीश पुरी हे एक असे अभिनेते होते, ज्यांना पडद्यावर पाहून प्रेक्षक घाबरुन जायचे. बॉलिवूडमधील या दिग्गज अभिनेत्याने बहुतांश चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. तरीही त्यांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. लोक आजही त्यांना 'मोगॅम्बो' या नावाने ओळखतात. फारच कमी लोकांना माहिती असेल की, अमरीश यांनी अभिनयासाठी आपली सरकारी नोकरी सोडली होती. आपल्या काळात ते यशाच्या शिखरावर होते.
अमरीश हे प्रसिद्ध गायक आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते केएल सेहगल यांचे चुलत भाऊ होते. त्यांच्यामुळे प्रभावित होऊन अमरीश यांचे मोठे भाऊ चमन पुरी, मदन पुरी चित्रपटात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांना चरित्र अभिनेता म्हणून कामही मिळत होतं. दरम्यान अमरीश 1950 च्या दशकात नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले. पण पहिल्या स्क्रीन टेस्टमध्ये रिजेक्ट झाले होते. पण यावेळी त्यांना कर्मचारी विमा महामंडळमध्ये नोकरी मिळाली होती.
सिने इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अमरीश पुरी यांनी सुमारे 21वर्षे कर्मचारी विमा महामंडळात लिपिक म्हणून काम केलं आहे. या काळात ते रंगभूमीवर अभिनय करण्याचा छंद जोपासू लागले होते. सत्यदेव दुबे लिखित नाटकांतून पृथ्वी थिएटरमध्ये काम करायला सुरुवात केली. प्रदीर्घ संघर्षानंतर अमरीश यां च्या अभिनयाला इथूनच ओळख मिळाली आणि वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी चित्रपटांमध्ये एंट्री घेतली होती.
अमरीश पुरी यांनी 1971 साली आलेल्या 'रेश्मा और शेरा' चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू दाखवून प्रेक्षकांची वाहवाह मिळवली होती. अमरिश जेव्हा आपल्या जबरदस्त आवाजात पडद्यावर डायलॉग्स बोलायचे तेव्हा क्षणभर सर्वच भयभयीत व्हायचे. हळूहळू ते इंडस्ट्रीचे लोकप्रिय खलनायक बनले होते. अमरीश पुरी यांनी एकापेक्षा एक चित्रपटात काम करुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण 'मिस्टर इंडिया'मधील 'मोगॅम्बो खुश हुआ' हा डायलॉग लोकांच्या मनात इतका खोलवर जाऊन बसला की, आजही लोक त्यांना याच नावाने ओळखतात. असं म्हटलं जातं की, या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे त्यांची फी देखील वाढली होती. तसेच अमरीश इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत सामील झाले होते. कधीकाळी अमरीश यांची फी चित्रपटाच्या नायकापेक्षाही जास्त होती.
अमरीश पुरी यांनी स्वत: इतकं नाव आणि प्रसिद्धी कमावली. पण आपला मुलगा राजीव पुरी यांना चित्रपटसृष्टीत येऊ दिलं नाही. यामागेही एक कारण होतं. आपल्या मुलानेही अनेक वर्षे इंडस्ट्रीत काम मिळण्यासाठी संघर्ष करावा असं त्यांना वाटत नव्हतं. अमरीश पुरी यांचा मुलगा राजीव याने 'बीबीसी'ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, 'त्यावेळी बॉलिवूडची स्थिती चांगली नव्हती. त्यामुळे वडिलांनी मला सांगितलं होतं की, इथे येऊ नकोस तुल जे काही आवडतं ते तू कर'. मग मी मर्चंट नेव्हीत रुजू झालो.असं त्यांनी सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment