मुंबई,22 डिसेंबर: दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अजूनही थांबण्याचं नाव घेत नाही. याबाबत बॉलिवूडमधील कलाकारही आपल्या प्रतिक्रिया देत आहे. शक्तिमान फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनीदेखील शेतकरी आंदोलनाबाबत एक वक्तव्य केलं आहे. मुकेश खन्ना नेहमीच राजकीय आणि सामाजिक विश्वातील घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. यामुळे ते बरेचदा वादातही अडकले आहेत. युट्यूबवरुन त्यांनी आपलं मत मांडलं आहे.
काय म्हणाले मुकेश खन्ना?
‘शेतकरी आंदोलन होण्यामागे महत्वाचं कारण आहे, शहरीकरणाकडे गरजेपेक्षा जास्त लक्ष दिलं गेलं आणि गावांचा, खेड्यांचा विकास करायलाच आपण विसरलो. पं जवाहरलाल नेहरुंनी फक्त अर्बनायझेशनकडे लक्ष दिलं यामुळे शहरांचा विकास झाला. पण गावांच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. गेल्या 70 वर्षापासून हेच सुरू आहे. शहारात बराच विकास झाला आहे. पण आता आपण गावांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं. मी कायमच शेतकऱ्यांचा पाठिशी उभा राहिलो आहे. मी आजही हेच सांगीन की, आपल्या बजेटमधील 70 टक्के पैसा गावांच्या विकासासाठी द्यायला हवा. देशाचं पोट भरणाऱ्या शेतकऱ्याकडे बरेचदा जेवायला अन्न नसतं. ही परिस्थिती बदलली पाहिजे.’
मुकेश खन्ना यांनी शेतकऱ्यांनाही आवाहन केलं आहे की, ‘तुम्ही रस्ते ब्लॉक करू नका. त्यामुळे सामान्य नागरिकांना फटका बसतो. सरकार चर्चा करायला तयार आहे तर तुमचे मुद्दे त्यांच्यासमोर मांडा.’ मुकेश खन्ना यांच्या वक्तव्यानंतर आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून तसंच इतर कलाकारांकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मुकेश खन्ना यांनी याआधी MeToo चळवळीबद्दल आणि महिलांबदद्ल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलही केलं होतं.