शिखा धारिवाल/मुंबई, 28 जुलै : टीव्ही शो 'मन की आवाज प्रतिज्ञा' (TV Show Mann Kee Awaaz Pratigya) यामधील आपल्या भूमिकेसाठी ओळखले जाणारे अभिनेते अनुपम श्याम (Anupam Shyam) यांना सोमवारी रात्री मुंबईतील एका रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आलं. मात्र या प्रसिद्ध अभिनेत्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्याच्या कुटुंबाने आर्थिक मदत मागितली होती. अनुपम यांच्यासाठी आता अभिनेता मनोज वाजपेयी धावून आला आहे.
अनुपम श्याम यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने इंडस्ट्रीतील लोकांकडे विशेषत: आमिर खान आणि सोनू सूदकडे मदत मागितली होती. मात्र मनोज वाजपेयी अनुपम श्याम यांना मदतीचा हात दिला आहे. त्याने एक लाख रुपयांची मदत दिली आहे. डायलिसिस झाल्यानंतर सोमवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली. अनुपम श्याम हे गोरेगावमधील लाइफलाइन रुग्णालयात दाखल आहेत.
हे वाचा - बॉलिवूडला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला जगाचा निरोप
अनुपम यांच्या आरोग्य आणि आर्थिक अडचणीबाबत त्यांच्या भावाने सांगितले की, गेल्या 6 महिन्यांपासून त्यांची तब्येत खराब झाली आहे. त्यांच्या मूत्रपिंडात संसर्ग झाला असून ज्यामुळे त्यांना हिंदूजा रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. तेथे दीड महिन्यापर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना वारंवार डायलिसिस करण्याचा सल्ला देण्यात आला होता. डायलिसिसमध्ये खूप खर्च झाल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक उपचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र आयुर्वेदिक उपचाराचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर डायलिसिस न केल्यामुळे त्यांच्या छातीत पाणी जमा झाले. आता डायलिसिस पुन्हा सुरू केले तेव्हा त्यांना बरं वाटतं आहे.
हे वाचा - नात आणि सुनेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर महानायकाला कोसळलं रडू!
अनुराग यांनी सांगितले की मालाडच्या एका रुग्णालयात त्यांना डायलिसिससाठी आणलं होतं. येथील ड़ॉक्टरांनी त्यांना आयसीयू असलेल्या रुग्णालयात हलविण्यात सांगितले. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांच्यावर उपचार करणे कठीण जात असल्याचे त्यांच्या भावाने सांगितले. श्याम यांचे पैसे त्यांच्या उपचारावर खर्च झाल्याचे अनुराग यांनी सांगितले.