सुल्तानपूर (उत्तर प्रदेश) 30 जानेवारी : एकामेकांच्या प्रेमात पडलेली जोडपी प्रेमासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होतात. या नात्याला विरोध करणाऱ्या व्यक्तींची मनधरणी करण्याचे अनेक प्रकार होतात. या मनधरणीला यश मिळत नाही हे लक्षात येताच काही जोडपी पळून जातात. तर काही गुन्हेगारी कृत्यं करतात.
आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्याची इच्छा असलेल्या एका तरुणाला आता जेलमध्ये जावं लागलं आहे. कारण, त्यानं गर्लफ्रेंडच्या वडिलांना फसवण्यासाठी स्वत:च्याच अपहरणाचा (Kidnaping) बनाव रचला होता. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुल्तानपूर (Sultanpur) मधील ही घटना आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या 20 वर्षांच्या तरुणासह त्याला यामध्ये मदत करणाऱ्या मित्राला देखील अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
जितेंद्र असं या प्रकरणातल्या आरोपीचं नाव आहे. तो संगीत शिकण्याचं निमित्त करुन 23 जानेवारी रोजी अमेठीहून वाराणसीसाठी रवाना झाला होता. जितेंद्र अमेठीतून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील सुरेंद्र कुमार यांना मुलाचं अपहरण झाल्याचा फोन आला. ‘जितेंद्र आमच्या ताब्यात असून त्याला सोडवण्यासाठी 10 लाख रुपये द्या’ अशी मागणी फोन करणाऱ्या व्यक्तीनं केली होती.
जितेंद्रच्या वडिलांनी या प्रकरणात पोलिसांकडे धाव घेतली. ‘या प्रकरणात धमकीचा फोन हा रवीच्या मोबाईलवरुन आला होता. असं पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं. 24 जानेवारी रोजी रात्री 2 दोन वाजता त्या फोनमधील सिम कार्ड बदलण्यात आलं होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता हा फोन करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी सिम कार्ड ज्याच्या नावावर आहे, त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी शिवगडहून रवी या तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. रविनं पोलिसांच्या चौकशीमध्ये तो जितेंद्रचा मित्र असून त्याच्या सांगण्यानुसारच अपहरण नाट्य रचल्याचे कबूल केलं.
रवीच्या कबुलीनंतर पोलिसांनी जितेंद्रलाही अटक केली आहे. आपल्या गर्लफ्रेंडच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता. त्यांना फसवण्यासाठीच हे सर्व नाट्य केल्याचं जितेंद्रनं मान्य केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Uttar pradesh