ठाणे, 22 ऑक्टोबर : कोरोनाचा प्रसार सर्वत्र होत असतानाच कोणीही गाफिल राहू नये असं आवाहन खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच केलं असतानाही काही नागरिक मात्र अशा इशाऱ्याना गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ठाणेनगर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक मोहिनी पाटील यांनी आज एक धडक मोहीम हाती घेतली आणि विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पकडून दंड केला.
अनेक दुकानदार, नागरिक विनामास्क फिरत असल्याने कोरोनाचा प्रसार आणखी जोरात होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे पो.नी पाटील यांनी हाती घेतलेल्या मोहिमेचे महत्व वाढले आहे. याच मोहिमेदरम्यान दुकानांची तपासणी करत असताना एका दुकानात दोन अल्पवयीन मुलं काम करत असल्याचे देखील त्यांना आढळले.
त्यांनी या मुलांची ताबडतोब सुटका केली व त्यांना ठाणेनगर पोलीस स्थानकात आणले. सदर दुकानाच्या मालकांना देखील पोलीस स्थानकात आणून त्यांच्यावर बालमजूर कायद्यांअंतर्गत कारवाई करणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
हेही वाचा - ड्रग्ज धंद्याविरोधात लढणाऱ्यावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर CCTV मध्ये झाले कैद
दरम्यान, महाराष्ट्रासह देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरीही कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाबाबत सांगण्यात आलेल्या उपाययोजनांचं नागरिकांनी अजूनही पालन करण्याची गरज आहे.