'माझ्या पार्थिवाला पत्नीनं अग्नी द्यावा', शेवटची इच्छा व्यक्त करत तरुणाची आत्महत्या
'माझ्या पार्थिवाला पत्नीनं अग्नी द्यावा', शेवटची इच्छा व्यक्त करत तरुणाची आत्महत्या
Representative Image
Suicide in Aurangabad: औरंगाबादमधील एक तरुणानं शुक्रवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आपल्या पत्नीनं मृतदेहास अग्नी द्यावा, अशी शेवटची इच्छा त्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
औरंगाबाद, 22 मे: मागील दीड वर्षांपासून राज्यात सातत्यानं लॉकडाऊन (Corona Lockdown Impact) लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनचा काळ, डोक्यावर कर्ज (Loan) आणि त्यात धंदा ठप्प यामुळे तणावाखाली आलेल्या तरुणानं गळफास (Man Suicide) घेऊन स्वतःचं जीवन संपवलं आहे. आत्महत्येपूर्वी मृत तरुणानं चिठ्ठी लिहून त्यामध्ये माझ्या पत्नीनं पार्थिवाला अग्नी द्यावा, अशी शेवटची इच्छा व्यक्त केली आहे. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
संबंधित 30 वर्षीय मृत तरुणाचं नाव भीमराव कांबळे असून तो औरंगाबादमधील वेदांतनगर परिसरात आपल्या पत्नीसोबत वास्तव्याला होता. तो एक वाहनचालक होता. त्यानं लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी कर्ज काढून एक रिक्षा विकत घेतली होती. पण कर्ज काढून रिक्षा घेतल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाची साथ सुरू झाली. परिणामी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. त्यामुळे काम ठप्प झालं. लॉकडाऊनच्या काळात उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनत असताना, कर्जाचे हफ्ते भरणं अवघड होऊन बसलं.
त्यामुळे संबंधित तरुण मागील बऱ्याच दिवसापासून तणावाखाली जगत होता. गुरुवारी रात्री पत्नीशी बोलतानाही तो तणावातच होता. गुरुवारी रात्री जेवन झाल्यानंतर साडे दहाच्या सुमारास भीमराव घराबाहेर पडला. तासाभरात घरी येतो, असं सांगून घराबाहेर पडलेले भीमराव बराच वेळ उलटून गेला तरी घरी परतला नाही. काही वेळ वाट पाहिल्यानंतर मृताची पत्नीनं जवळचे मित्र आणि नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. पण त्यांचा काही थांगपत्ता लागला नाही.
हे ही वाचा-हृदयद्रावक! सॉरी बाबा, सासरी येऊन चूक केली; व्हिडिओ शेअर करत तरुणीची आत्महत्या
यानंतरही पत्नीनं आपला शोध सुरूच ठेवला. यावेळी शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास राजनगरातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत भीमराव यांचा मृतदेह आढळला. या घटेनची माहिती मिळताचं वेदांत नगर पोलीस ठाण्यात रात्रपाळीवर असलेले पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृताला फासावरून खाली उतरवून रुग्णालयात दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यावेळी त्याच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीत त्यानं डोक्यावरील कर्जाच्या ओझ्यामुळं आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच आपल्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये, असंही त्यानं चिठ्ठीत लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.