भोपाळ 27 मार्च : हृदय पिळवटून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून रविवारी एका 30 वर्षीय महिलेने चार मुलांसह विहिरीत उडी घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात महिलेच्या तीन निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे, तर महिला आणि तिची एक मुलगी बचावली आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
विहिरीत उडी मारताच महिला घाबरू लागली आणि बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागली. यादरम्यान तिने मोठ्या मुलीसह विहिरीत लटकलेली दोरी पकडली आणि ती धरून बाहेर आली. परंतु महिलेच्या तीन मुलांचा मृत्यू झाला, त्यात 18 महिन्यांचा मुलगा, 3 वर्षांची मुलगी आणि 5 वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. पोलिसांनी तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
ग्राहकाच्या त्रासाला कंटाळून दुकानदाराचं टोकाचं पाऊल, काय आहे प्रकरण?
पोलीस अधीक्षक राहुल कुमार यांनी सांगितलं की, ही घटना बुरहानपूर जिल्हा मुख्यालयापासून ६० किमी अंतरावर असलेल्या बालदी गावात घडली. त्यांनी सांगितलं की, प्रमिला भिलाला असे महिलेचे नाव आहे. महिलेचे पती रमेशसोबत भांडण झाले, त्यानंतर तिने हे पाऊल उचलले. सध्या प्रमिला आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलीची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसपी राहुल कुमार यांनी सांगितलं की, प्रमिलाच्या घराजवळ असलेल्या विहिरीतून तिन्ही मृतदेह काढण्यात आले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस महिलेच्या कुटुंबाची पार्श्वभूमीही तपासत आहेत.
काही दिवसांपूर्वी बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर तहसीलमधील दावली खुर्द गावात एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्या केली होती. येथे एका घरात पती-पत्नीसह तीन अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळून आले. सर्व मृत मुले 10 वर्षांपेक्षा कमी वयाची होती. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, या सामूहिक आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Shocking news