हैदराबाद, 12 डिसेंबर: परदेशातील नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केलेल्या घटना आपण नेहमी वाचतो. या प्रकरणात परदेशात अडकलेल्या नागरिकांचे मदत मागणारे व्हिडीओ देखील यापूर्वी व्हायरल (Viral) झाले आहेत. विशेषत: पश्चिम आशियाई देशांमध्ये असे फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात. ट्रॅव्हल एजंटवर (Travel Agent) विश्वास ठेवून दुबईमध्ये (Dubai) नोकरीसाठी गेलेल्या पाच महिलांच्या फसवणुकीची एक घटना आता समोर आली आहे. या महिलांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी भारत सरकारने (Government of India) मदत करावी अशी मागणी केली आहे.
काय आहे प्रकरण?
तेलंगणाची (Telangana) राजधानी हैदराबादमधील (Hyderabad) या सर्व पीडित महिला आहेत. बदरुनिसा नावाच्या महिलेनं या प्रकरणात सफी या ट्रॅव्हल एजंटवर फसवणुकीचा आरोप केला आहे. त्यांच्या मुलीला नोकरी देण्याचं आमिष दाखवून दुबईला नेण्यात आलं आता तिला तिथे त्रास दिला जात आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
एका अन्य पीडित महिलेची बहिण शमिना बेगम यांनी देखील सफीवर आरोप केले आहेत. “ तो आपल्या बहिणीला नोकरीची स्वप्न दाखवून ऑक्टोबर महिन्यात दुबईला घेऊन गेला आणि तिची फसवणूक केली. आता तिला भारतामध्ये परत येण्याची इच्छा आहे. तिला देशात येण्यापासून रोखलं जातंय, भारत सरकारनं तातडीनं आमची मदत करावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एजंटकडून पैशांची मागणी
“आमच्या मुलींना ज्या कामाचं आश्वासन देऊन दुबईमध्ये नेण्यात आलं होतं ते काम त्यांना मिळाले नाही. आम्हांला त्यांची सत्य परिस्थिती समजली आहे. मुलींना भारतामध्ये परत आणण्यासाठी एजंट आमच्याकडून दीड लाख रुपयांची मागणी करत आहे, आम्ही गरीब कुटुंबातील असून इतकी रक्कम देणं आम्हाला शक्य नाही, त्यामुळे सरकारनं या प्रकरणात तातडीनं लक्ष द्यावं आणि दुबईत अडकलेल्या आमच्या मुलींची मुक्तता करावी’’, अशी मागणी या मुलींच्या कुटुंबीयांनी केली आहे.