नवी दिल्ली, 23 मे : योगगुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यात अॅलोपॅथी थेरपीच्या संदर्भात दिलेल्या निवेदनावरून आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हस्तक्षेप केला आहे. यासंदर्भात त्यांनी योगगुरू रामदेवबाबा यांना पत्र लिहलं आहे, तसंच त्यांनी रामदेव बाबांना वादग्रस्त विधान मागं घेण्यास सांगितलं आहे. योगगुरु रामदेव यांनी अॅलोपॅथी आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यामुळं वाद वाढत चालला आहे. रामदेव यांच्या वक्तव्याविरोधात आयएमएनं आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रामदेव यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, अॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका करणं दुर्दैवी आहे. आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. करोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जणू देवदूत आहेत. अशा वेळेत आपण करोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालंय. आपण जे स्पष्टीकरण दिलंय तेवढ्यानं वेदना, दु:ख शमणार नाही.
संपूर्ण देशवासियों के लिए #COVID19 के खिलाफ़ दिन-रात युद्धरत डॉक्टर व अन्य स्वास्थ्यकर्मी देवतुल्य हैं।
बाबा @yogrishiramdev जी के वक्तव्य ने कोरोना योद्धाओं का निरादर कर,देशभर की भावनाओं को गहरी ठेस पहुंचाई। मैंने उन्हें पत्र लिखकर अपना आपत्तिजनक वक्तव्य वापस लेने को कहा है। pic.twitter.com/QBXCdaRQb1 — Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) May 23, 2021
लाखो करोना रुग्णांचा मृत्यू अॅलोपॅथी औषधं घेतल्याने झाल्याचं आपलं वक्तव्य चुकीचं आहे. आपल्याला करोनाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढायची आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहेत. ते दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहेत, आशा आहे की आपण या विषयावर गंभीरतेने विचार कराल आणि कोरोना योद्धांचा सन्मान कराल. तसेच वादग्रस्त वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल, असंही त्यांनी पत्रात म्हंटलं आहे.
हे वाचा - गुजरातमधील पाचवी नापास आमदाराने दिलं कोरोना रुग्णाला रेमडेसिवीरचं इंजेक्शन, VIDEO व्हायरल
डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे की, तुमच्याकडून कोरोनावरील उपचारातील अॅलोपॅथी थेरपिस्टना 'तमाशा', 'फालतू' आणि 'दिवाळखोर' म्हणणं दुर्दैवी आहे. आजच्य घडीला कोट्यवधी लोक कोरोना आजारातून बरे होऊन घरी जात आहेत. देशात कोरोनाचा मृत्यू दर फक्त 1.13 टक्के आहे आणि रुग्ण बरे होण्याचा दर 88 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्यामागे अॅलोपॅथी आणि सर्व डॉक्टरांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आरोग्यमंत्र्यांनी लिहिलं आहे की, योगगुरु रामदेव यांचे समाजामध्ये नाव आहे, सामाजिक कामात त्यांचे योगदान असते, अशा व्यक्तीच्या एखाद्या वक्तव्याचा प्रभाव लोकांवर पडत असतो. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्ये करताना वेळ, काळ पाहून विचारपूर्वक बोलायला हवं. त्यांच्या वक्तव्यामुळं डॉक्टरांच्या क्षमता आणि कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. कोरोनाविरूद्धचा आपला लढा कमकुवत होऊ शकतो.
काय आहे प्रकरण?
योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूमागे अॅलोपॅथी औषधोपचार कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं आहे. कोरोना रुग्णांवर अॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यांच्या या विधानामुळे कोरोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयएमएनं आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पंतजली योगपीठने योगगुरु रामदेव यांचं तशी भावना नसल्याचं सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Baba ramdev, Central government