नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की कोरोना रुग्णांवर कोविशील्ड (covishield) लस (Coronavirus Vaccine) अत्यंत प्रभावी आहे. त्यांचे म्हणणे आहे की covishield कोरोनाविरूद्ध 70 टक्के प्रभावी आहे. आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अदार पूनावाला यांनी या लसीवर प्रतिक्रिया दिली आहे. पूनावाला यांनी, या लशीचे 10 कोटी डोस जानेवारीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील असे सांगितले आहे. यासह फेब्रुवारीच्या अखेरीस आणखी लाखो डोस उपलब्ध करुन देण्याची योजना आहे.
अदार पूनावाला यांनी एनडीटीव्हीशी बोलताना, या लसीचा एक डोस जर फार्मसीमधून विकत घेतला तर त्याची किंमत 1000 रुपये असेल, मात्र सरकारला 250 रुपये प्रति डोस दराने लस दिली जाईल. पूनावाला यांच्या कंपनीने सरकारबरोबर लस मोठ्या प्रमाणात तयार करण्याचा करार केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की लसीचे सुमारे 4 कोटी डोस आधीच तयार केले गेले होते.
वाचा-खूशखबर! पुण्याच्या सीरम कंपनीने तयार केलेली कोरोना लस 70 टक्के परिणामकारक
पूनावाला म्हणाले की, ही लस भारतात उपलब्ध होण्यासाठी सुमारे 2 ते 3 महिने लागतील. मात्र जानेवारीपर्यंत आमच्याकडे किमान 10 कोटी डोस उपलब्ध असतील. त्याचबरोबर जुलैपर्यंत 30 ते 40 कोटी डोस देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. आम्ही याची किंमत 1000 रुपये निश्चित करीत आहोत. बाजारात ही किंमत 500 किंवा 600 रुपये असेल. सरकारसाठी ते 250 रुपये किंवा त्याहूनही कमी असू शकते.
वाचा-कोरोनासंदर्भात लावलेले शोध हे फक्त हिमनगाचं टोक; चीनच्या बॅट वूमनचा दावा
कोरोना लस 70 टक्के परिणामकारक
फेज 3 च्या चाचणीत ऑक्सफोर्ड अॅस्ट्रॅजेनेका कोविड लस 70% पेक्षा जास्त प्रभावी होती. सोमवारी जाहीर केलेल्या अंतिम विश्लेषणात या लशीची कार्यक्षमता 70.4 टक्के प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. पहिला डोस दिल्यानंतर त्याचे परिणाम 90 टक्क्यांपर्यंत दिसून आले होते. मात्र दुसऱ्या डोसनंतर 62 टक्के परिणामकारकता दिसल्याचं सांगितलं जात आहे. दोन्हीचं एकत्र विश्लेषण केल्यास ही लस 70 टक्के परिणामकारक असल्याचं सांगितलं जात आहे. सर्व विश्लेषणातून ही लस कोरोनाचा संसर्ग कमी करू शकते त्यासाठी ही प्रभावी असल्याचं प्राथमिक माहितीमध्ये समोर आलं आहे. तर दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाचणीदरम्यान ही लस सुरक्षित असल्याचा कंपनीनं दावा केला आहे. मानवी चाचणीदरम्यान कोणत्याही स्वयंसेवकाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली नाही. भारतासाठी ही गोष्ट खूप चांगली असल्याचं देखील सीरम कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.