मराठी बातम्या /बातम्या /करिअर /UPSC च्या मुलाखतींमध्ये जात बघून दिले जातात मार्क; आपच्या मंत्र्याचा खळबळजनक आरोप

UPSC च्या मुलाखतींमध्ये जात बघून दिले जातात मार्क; आपच्या मंत्र्याचा खळबळजनक आरोप

UPSC

UPSC

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये होत असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे हे तीन टप्पे असतात.

    नवी दिल्ली, 17 जुलै : यूपीएससी (Union Public Service Commission) परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या जातीनुसार त्यांना मार्क दिले जातात, असा खळबळजनक आरोप दिल्लीच्या आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मंत्री राजेंद्र पाल गौतम (Rajendra Pal Gautam) यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी यूपीएससीच्या अध्यक्षांना एक पत्रही लिहिलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी अनुसूचित जाती व जमाती, तसंच इतर मागासवर्गीयांसोबत भेदभाव केला जात असल्याचं म्हटलं आहे.

    राजेंद्र पाल गौतम यांनी या पत्रात लिहिलंय की, यूपीएससीमध्ये (UPSC) अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांच्या जातींबाबत मुलाखत घेणाऱ्यांना आधीच माहिती असते. त्यामुळे अशा उमेदवारांचे मार्क कमी करुन त्यांच्यासोबत भेदभाव केल्याच्या घटना वारंवार समोर येतात. यामुळेच मुलाखत घेणाऱ्याला उमेदवारांच्या जातीबाबत माहिती मिळणार नाही अशी तरतूद हवी. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    यासाठीच दिल्लीचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र यांनी यूपीएससीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कुमार जोशींना (UPSC Chairman Pradeep Kumar Joshi) आपल्या पत्रातून काही उपाय सुचवले आहेत. यामध्ये ते सांगतात, की मुलाखत घेणाऱ्या बोर्ड मेंबर्सना उमेदवाराच्या जातीबाबत माहिती मिळू नये अशी व्यवस्था करायला हवी. यासोबतच रिझर्व्ह आणि जनरल (General) अशा कॅटेगरीनुसार मुलाखत न घेता; रँडमली कोणत्याही उमेदवाराला बोलवून त्याची मुलाखत घेतली जावी असंही त्यांनी सुचवले आहे (Rajendra Pal letter to UPSC Chairman).

    IIT ते IAS ऑफिसर प्रतिभा वर्मा यांच्या परिश्रमांचा प्रवास; तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश

    केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये होत असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे हे तीन टप्पे असतात. यातील मुलाखत ही नवी दिल्ली येथे घेतली जाते. या मुलाखतीमध्येच उमेदवारांची जात बघून त्यांना मार्क दिले जातात, असं माहिती अधिकारात (Delhi Government RTI) समोर आल्याचं दिल्ली सरकारने म्हटलं आहे. प्रशासकीय सेवेत जाऊन देशसेवा करण्याचं अनेक तरुणांचं स्वप्न असतं. त्यामुळे ते अनेक वर्षं तयारी करून ही परीक्षा व मुलाखत देत असतात. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील विद्यार्थी या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे, मुंबईत दाखल होतात.

    दरम्यान, शुक्रवारी यूपीएससीने संयुक्त सुरक्षा सेवा (CDS) परीक्षा-2, 2020चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामधून इंडियन मिलिट्री अकॅडमीसाठी 71, इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी 49 आणि एअर फोर्स अकॅडमीसाठी 9 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांच्या नावांची यादी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

    First published:
    top videos

      Tags: AAP, Upsc exam