मुंबई, 11 मार्च : प्रशासकीय परीक्षा देऊन सरकारी नोकरी मिळवणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी भरपूर अभ्यास व मेहनतीची तयारी ठेवावी लागते. देशातले लाखो तरूण दरवर्षी प्रशासकीय सेवा परीक्षा देतात. मात्र काहीच जण ही परीक्षा उत्तीर्ण होतात. देशातलं एक गाव असं आहे, की तिथले अनेक तरूण आत्तापर्यंत प्रशासकीय सेवांमध्ये नियुक्त झालेले आहेत. केवळ 75 घरं असलेल्या उत्तर प्रदेशमधल्या या गावातून आत्तापर्यंत देशाला 47 आयएएस आणि आयपीएस अधिकारी मिळाले आहेत.
उत्तर प्रदेशमधल्या एका गावानं आजपर्यंत देशाला सर्वांत जास्त आयएएस आणि आयपीएस अधिकारी दिले आहेत. ते म्हणजे राजधानी लखनऊपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेलं जौनपूर जिल्ह्यातलं माधोपट्टी गाव. मीडिया रिपोर्ट्सनुसार 75 घरांच्या या गावातून आत्तापर्यंत देशाला 47 आयएएस आणि आयपीएस अधिकारी मिळाले आहेत. त्याव्यतिरिक्त आणखी काही नागरिक विविध ठिकाणी उच्चपदांवर काम करत आहेत. त्यामुळे एकूण 51 उच्च पदस्थ अधिकारी या गावानं दिले आहेत.
सर्वांत आधी 1952मध्ये या गावातल्या डॉ. इंदुप्रकाश यांनी यूपीएससीमध्ये दुसरी रँक मिळवली होती. त्यांची आयएएस म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांचे 4 भाऊही आयएएस अधिकारी झाले. इंदुप्रकाश यांनी फ्रान्ससह इतरही काही देशांचे राजदूत म्हणून काम केलं आहे. त्यांचा मुलगा यशस्वीही 2002मध्ये 31 वी रँक मिळवून आयएएस झाला. मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा गावाशी काहीही संबंध राहिला नाही. एका अहवालानुसार, 2019नंतर या माधोपट्टी गावातून एकही आयएएस किंवा आयपीएस अधिकारी बनला नाही. शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक समाजसेवक आणि गावकरी असलेले रणविजय सिंह यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही वर्षांमध्ये या गावातून अनेक तरूण प्रशासकीय सेवांमध्ये गेले. त्यामुळे या गावाला ‘आयएएसचा कारखाना’ असं म्हटलं जाऊ लागलं. या गावातून आयएएस अधिकाऱ्याबरोबरच पीसीएस अधिकारीही देशाला मिळाले आहेत. काही महिलाही पीसीएस अधिकारी बनल्या आहेत. आयएएस आणि आयपीएसमध्ये गावातल्या मुलींनी बाजी मारली आहे. मात्र या अधिकाऱ्यांनी नंतर गावाकडे पाठ फिरवली. त्या सर्वांची प्रगती झाली मात्र गावाची प्रगती होऊ शकली नाही. सरकार दरबारी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात ते कमी पडल्याचं रणविजय सिंह यांनी म्हटलं आहे.
(ग्रॅज्युएट उमेदवारांनो, 'या' विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक; करा अप्लाय)
या गावातून इतके आयएएस, आयपीएस अधिकारी तयार झाल्याचं श्रेय जौनपूर जिल्ह्यातल्या तिलक धारी सिंह पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेजला सुद्धा असल्याचं गावातले एक शिक्षक कार्तिकेय सिंह यांनी सांगितलं आहे. या गावातले विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच प्रशासकीय सेवा परीक्षांची तयारी सुरू करतात. त्यामुळे या गावातून आजवर अनेक विद्यार्य़ी आयएएस, आयपीएस परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.