अमेय चुंभळे, प्रतिनिधी, न्यूज18 लोकमत.
या महिलेचा चेहरा लक्षात ठेवा. भारताच्या तथाकथित विकासाचा हा दुर्दैवी चेहरा आहे. कुमकुम सिंह या महिलेच्या पतीचा आणि १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कसा? वाराणसी रेल्वे स्थानकासमोर त्यांच्या गाडीवर उड्डाणपुलाचा पिलर पडला. सुकलेल्या पानावरून गाडीचं टायर जावं तसे चिरडले गेले तिचे पती आणि मुलगा. त्यांच्या शरिराचं काय शिल्लक राहिलं, कळायला मार्ग नाही. मुलगा सुट्टीत कोट्याहून घरी आला होता. त्याला सोडायला हे पती-पत्नी स्टेशनवर जात होते.
दहशतवादी हल्ल्यानंतर होतो तसा गदारोळ आणि चर्चा यावर मात्र फारशी झाली नाही.
कारण एकच – सडलेल्या सिस्टमची आपल्याला झालेली सवय. किती नागरिक गेले या सरकारी हत्याकांडात? तब्बल 19 निष्पाप नागरिक. विनाकारण, कोणतीही चूक किंवा गुन्हा नसताना १९ लोक गेले. म्हणजे १९ कुटुंब उद्ध्वस्त झाली. पुढची २० वर्षं कोणताही पूल बघितला की त्यांना आठवेल – माझी आई, वडील किंवा भाऊ अशाच एका पुलाखाली दबून मेले होते. पण याहून धक्कादायक काय आहे माहितीये ?
गुन्हे तर दाखल झालेत. पण कुणालाही अटक नाही. संबंधित सरकारी अधिकारी, कंत्राटदार, साईटवरचे अभियंते... सगळे बाहेर, मुक्त जगतायेत. एफआयआरमध्ये त्यांची नावंही नाहीयेत. निनावी एफआयआर. भारताच्या पोलीस प्रशाशनानं शोधून काढलेली एक नवी पद्धत – इतके लोक गेले तरी एफआयआरमध्ये आरोपींच्या नावाचा उल्लेख करण्याची गरज नाही. अजिबात नाही. उत्तरदायित्व, जबाबदारी हे फक्त भारदस्त शब्द. सरकारी प्रशासनाच्या विश्वात त्यांना त्या मेलेल्यांएढीही किंमत नाही.
घटनेच्या कलम २१ अंतर्गत सर्वांना जगण्याचा अधिकार आहे. सदोष मनुष्यवध हा जामीनपात्र असला तरी गुन्हाच आहे. पण आमच्या देशात आरोपी पाहून कायद्याचा वापर होतो आणि सिस्टम कधीच चुकू शकत नाही. चुकतात ते सामान्य लोक. त्यातही धर्मानुसार कमी-जास्त होतं तो भाग वेगळा.
ही घटना घटली ते शहर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. त्याचबरोबर भारतातलं सर्वाधिक महत्वाचं धार्मिक स्थळ आहे. अशा ठिकाणी प्रशासनानं किती संवेदनशील काम केलं पाहिजे? पण सब कुछ चलता है या वृत्तीनंच देशाचा घात केलाय.
आपल्या मर्जितल्या कंत्राटदारांना कामं द्यायची, त्यांच्याकडून टक्केवारी घ्यायची. ना वेळचं बंधन ना गुणवत्तेचं. गेली अनेक दशकं आपल्याकडे असच सुरू आहे. याच राजकारणी आणि कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळं शेकडो लोकांचे बळी गेले. कोट्यवधी लोकांना त्रास सहन करावा लागतोय. त्याचं कुणालाच काही नाही? सब कुछ चलता है ही वृत्ती, ही बेपर्वाई थांबणार तरी कधी हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Dead, Flyover, Narendra modi, Uttar pradesh, Uttra Pradesh, Varanasi