औरंगाबाद, 16 एप्रिल : औरंगाबादमध्ये भाजपचे आमदार प्रशांत बंब (BJP MLA Prashant Bamb) आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. संचारबंदीमध्ये नातेवाईकांची गाडी अडवल्याच्या कारणावरून आमदार बंब आणि पोलिसांत (Argument between police and MLA Bamb) हा वाद झाल्याचं समोर येत आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या प्रशांत बंब यांनी पोलिसांना गाडी का अडवली अशी विचारणा केल्यानंतर वाद वाढला.
(वाचा - ताईसाहेब! मोदींना एखादं पत्र लिहिलं तर बरं होईल, पंकजांना धनंजय मुंडेंचं उत्तर)
ब्रेक द चेन अंतर्गत संपूर्ण राज्यात सरकारनं संचारबंदी आणि कडक निर्बंध लावलेले आहेत. त्यानुसार कलम 144 लागू केलेलं असल्यानं विनाकारण शहरात फिरण्यास सर्वांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करून लोकांनी विनाकारण फिरू नये म्हणून कारवाई करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी औरंगाबाद शहरात महात्मा फुले चौकात एका तरुणाला अडवलं. त्यावर या तरुणाने कोरोना रुग्ण असलेल्या नातेवाईकाला काही वस्तू देण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याला आणखी विचारपूस केली आणि त्याच्यावर कारवाई केली.
(वाचा -'बेड द्या, नाहीतर बापाला मारुन टाका'; वडिलांच्या उपचारासाठी मुलाचा संघर्ष)
यानंतर तरुणानं फोन करून आमदार प्रशांत बंब यांना बोलावून घेतलं. यानंतर प्रशांत बंब त्याठिकाणी आले आणि त्यांचा पोलिसांबरोबर वाद झाला. तरूण हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णाला भेटायला गेला होता, त्याला का अडवले असा सवाल प्रशांत बंब यांनी केला. अशाप्रकारे पोलीस लोकांना अडवू शकत नाही, असंही बंब म्हणाले. मात्र पोलिसांनी तरुणावर शंका आल्याने कारवाई केल्याचं स्पष्टपणे सांगितलं. त्यावरुनही बंब आणि पोलिसांत वाद झाला. संबंधित तरुण हा बंब यांचा नातेवाईक होता, अशी माहितीदेखील समोर आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तरीही काही लोक विनाकारण काहीही कारणं देत बाहेर फिरण्याचा प्रयत्न करतात. अशांना पोलिसांकडून अडवून समज दिली जाते. तसंच काहींवर कारवाई केली जात आहे. कोरोनाची साखळी तुटावी यासाठी सरकार आणि प्रशासनाच्या या प्रयत्नाला सर्वांची साथ मिळणं गरजेचं आहे.