नवी दिल्ली, 3 डिसेंबर : सूर्यग्रहण (Solar Eclipse) किंवा चंद्रग्रहण (Moon Eclipse) ही अवकाशातली वैशिष्ट्यपूर्ण स्थिती असते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या ग्रहण ही एक विस्मयकारक घटना असते. सूर्य हा ग्रहमालेतला अत्यंत महत्त्वाचा घटक. ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) सूर्य (Sun) अर्थात रवीला पिता मानलं जातं. सूर्यग्रहण केवळ अवकाशात दिसून येतं असं नाही, तर ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतदेखील ग्रहणयोग असतो. हा योग सूर्य अर्थात रवी आणि राहू (Rahu) यांच्या युतीमुळे तयार होतो. कुंडलीतला हा योग अशुभ मानला जातो. याचा प्रतिकूल परिणाम संबंधित व्यक्तीच्या जीवनावर (Life) झाल्याचं दिसून येतं. `झी न्यूज`ने या योगाविषयीची माहिती दिली आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती कठोर परिश्रम, प्रयत्न करूनही यशस्वी होत नाही, तेव्हा त्या व्यक्तीची पावलं ज्योतिषशास्त्राकडं वळतात. सातत्यानं येणाऱ्या अपयशामुळे व्यथित झालेली व्यक्ती ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला घेते. 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रं माणसाच्या जीवनावर परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्योतिषशास्त्रातल्या संकल्पना याच सूत्रावर आधारित आहेत. ज्योतिषशास्त्रात विविध ग्रहांचे योग आणि त्याचे परिणाम विशद करण्यात आले आहे. सूर्य–राहू युती योग हा त्यापैकीच एक. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य-राहू युती असते, त्या व्यक्तीला जीवनात प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो. त्या व्यक्तीची प्रगती होत नाही. शारीरिक (Physical) आणि मानसिक आरोग्यावरही (Psychological Health) परिणाम होतो.
हे ही वाचा-12 वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये गुरूचा प्रवेश; या 5 राशींचे नशीब चमकणार
कुंडलीत राहूचा सूर्यावर प्रतिकूल परिणाम झाला तर सूर्यग्रहण योग होतो. राहू-सूर्य युती लग्न स्थानात असणं किंवा राहू लग्न स्थानात असेल तर सूर्यग्रहण योग होतो. राहूचा सूर्यासोबत योग असल्यास पितृदोषदेखील असतो. सूर्यग्रहण योग कुंडलीत ज्या स्थानात असतो, त्या स्थानाशी निगडित गोष्टींमध्ये व्यक्तीचं नुकसान होतं. कुंडलीत असा योग असता त्यावर काही उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितले आहेत.
कुंडलीत सूर्याला बळ नसेल किंवा सूर्यग्रहण योग असेल तर संबंधित व्यक्तीने गहू, गूळ आणि तांबे या वस्तू दान कराव्यात. स्वतःच्या डोक्यावरून 6 वेळा नारळ उतरवून तो वाहत्या पाण्यात सोडल्यास लगेच सकारात्मक परिणाम जाणवतो. हनुमान चालिसा पठण केल्यानं फायदा होतो; मात्र हनुमान चालिसाचे पाठ करतानाच्या काळात संबंधित व्यक्तीनं मांसाहार आणि दारू या गोष्टी वर्ज्य कराव्यात. अंध व्यक्तींना दान आणि मदत करणंही फायदेशीर ठरतं. तसंच पिंपळाच्या झाडाला दररोज पाणी घातल्यास या योगाच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होते.
कुंडलीत राहू-सूर्य योग किंवा युती असल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनात अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. जीवनात स्थिरता (Stability) नसते. सूर्यग्रहण योगामुळे व्यक्तीला हाडांशी (Bones) संबंधित विकार होतात. यश आणि सन्मान मिळत नाही. तसंच अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास नसतो. घरात वडील आणि महिलांशी वारंवार वाद होतात. विवाह उशिरा होणं, मुलांमुळे दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागणं, अशा गोष्टी घडतात. अशा व्यक्तींच्या तोंडात कायम लाळ जमा होते आणि त्यांना गंभीर आजारांना सामोरं जावं लागतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Health