रोहित पवार
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 10 जुलै : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे अनेक आमदार अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी युती सरकारला पाठिंबा देत आपल्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी त्यांच्याविरोधात बारामतीमधून कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता त्यांनी त्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हणाले रोहित पवार? अजित पवारांच्या विरोधात बारामतीमधून कोणीही निवडून येऊ शकत नाही. मला तिकीट दिलं तरी मी लढणार नाही. अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बारामतीकर नाराज आहेत. मात्र तरीही मतदान दादांनाच होणार आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की अजित पवार यांच्याकडे सर्वाधिक पोटेंशिइल आहे. भाजपवाले लोकनेत्यांना जवळ घेतात आणि नंतर त्यांना संपवतात. मला भीती वाटते की भाजपवाले अजित पवार यांची देखील ताकद कमी करतील. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी अजित पवारांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. नाशिकमध्ये दादांचा फोटो नव्हता. चार ते पाच लोकं दादांना व्हीलन बनवण्याचं काम करत आहेत. दादांसोबत गेलेले लोकच त्यांना व्हीलन बनवत आहेत. निर्णय घेताना विकासासाठी निर्णय घेतला असं सांगतात. मग त्यांच्याकडे पद होतं तेव्हा त्यांनी काय केलं? असा सवालही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.