- News18 Lokmat
- Last Updated: January 1, 1970, 6:03 AM IST
अमोल गावंडे, बुलडाणा 05 डिसेंबर : सोशल मीडिया हा सध्या आयुष्यातला अविभाज्य घटक झालाय. या सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच काही दुष्परिणामही समोर येताहेत. याचं लोण आता ग्रामीण भागातही पोहोचलं आहे. पोलिसांच्या अभ्यासात हा धक्कादाय निष्कर्ष समोर आलाय. स्मार्टफोन फेसबुक, व्हॉटस्अँप यासारख्या माध्यमातून इतरांशी सतत संवाद साधला जातो. एकमेकांची ओळख नसताना मैत्री केली जाते. त्यातून खोटीनाटी आश्वासनं दिली जातात. याहून गंभीर म्हणजे अनेक विवाहित स्त्रिया या मोहाला बळी पडतात. यातून घरी पती-पत्नी एकदुसऱ्यांना कमी आणि मोबाईलवर सोशल मिडियाला जास्त वेळ देतात. खामगाव पोलिसांच्या आकडेवारीनुसार 35 ते 40 टक्के संसारात मोबाईल-सोशल मीडियामुळे दुरावा निर्माण झाल्याचं वास्तव पुढे आलंय.
नवीन टेक्नॉलॉजी, नव नवे मोबाईल, कॉम्प्युटर-लॅपटॉप आपल्या विकासासाठी आहेत. सोशल मीडियाही आपल्याला जगाशी कनेक्ट ठेवतो. पण या नादात आपले हक्काचे घरचे लोक मात्र दूर जातात. त्यामुळे प्रत्येकाने कुटुंबात असताना सोशल मीडियाच्या वापराची मर्यादा ठरवायला हवी, कारण जिथे अती होतं तिथे माती होते हेच दिसून आलंय. घरगुती वादाच्या अनेक केसेसमध्ये हाच प्रकार आढळून आलाय. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर दोघांनी एकदुसऱ्यांना वेळ दिणं गरजेचं आहे. मात्र सध्या बरेच पती-पत्नी मोबाईलवर फेसबूक, व्हॉटसपला जास्त वेळ देतात.
आता भाजपमध्ये आऊट गोईंग, हा मोठा नेता आहे शिवसेनेच्या रडावर
या समुपदेशन केंद्रात एका तालुक्यात मागील अकरा महिन्यात एकूण १४५ प्रकरणे दाखल झाली होती. यापैकी ६३ प्रकरणे समुपदेशाद्वारे सोडविण्यात आली असून ५ प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहे. तर काही प्रकरणे न्यायालयापर्यंत पोहचलेली आहे. मात्र यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे मोबाईल, व्हॉटसअॅप आणि फेसबुकच्या अतिवापरामुळे झालेल्या वादाचं आहे. अशी माहिती खामगावच्या महिला समुपदेशन केंद्राच्या प्रमुख प्रीती मगर यांनी दिलीय.
देवेंद्र फडणवीसांना दणका, निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या निर्णयांना स्थगिती
हुंडा, घरगुती हिंसाचार, दारुडा पती, व्यभीचार, विवाहबाह्य संबंध, नंपुसकता अशी कारणं पूर्वी घटस्फोटासाठी न्यायालयात या सारखी कारणं दिली जायची. पण आता हायटेक युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचा अतिवापरंही घटस्फोटाच कारण ठरतंय. ‘समा है सुहाना सुहाना, नशे मै जहा है. किसी को किसी की खबर ही कहा है’ या किशोर कुमार यांच्या गाण्यातील ओळी आजच्या तरुणाईला किंबहुना सर्वांनाच खूप काही शिकवून जातात असं काही लोकांचं मत आहे. इंटरनेट आल्यापासून जग जवळ आलं. पण जवळच्या गोष्टी तितक्याच लांब गेल्या हे आता पुढं आलंय.