मुंबई, 22 मे : राज्यासह देशभरात सोयाबीनचे उत्पादन (soybean farm) वाढवण्यासाठी वाटचाल सुरू आहे. दरम्यान सोयाबीनच्या नव्या वाणांचे संशोधन राज्यासह देशभरात घेतले जाते. इंदूर येथे झालेल्या भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेची (Indian Soybean Research Institute) 52 वी वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत उत्तरी पर्वतीय (हिमालय पर्वतमाला), उत्तरी मैदानी तसेच मध्य क्षेत्राकरीता सोयाबीनच्या नव्या सहा वाणांची (Six new varieties of soybeans) शिफारस करण्यात आली. त्यामध्ये अधिक उत्पादनक्षम तसेच येलो मोझॅक प्रतिकारक वाणाचा देखील समावेश असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
मध्य क्षेत्राकरिता असलेल्या वाणांमध्ये एनआरसी-152, एनआरसी-150, जेएस-21-72 तसेच हिम्सो-1689 हे वाण असल्याची माहिती देण्यात आली. एनआरसी-149 हे वाण येलो मोझॅक, राइजोक्टोनिया एरियल ब्लाइट सोबत गर्डल बीटल व पर्णभक्षी किडींना प्रतिकारक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हे ही वाचा : इगतपुरीत भीषण पाणी टंचाई; जीव धोक्यात घालूनही मिळतंय गढूळ-दुर्गंधीयुक्त पाणी
एनआरसी-150 हे वाण अवघ्या 91 दिवसांत परिपक्व होते. सोयाबीनमध्ये विशिष्ट गंध येतो, हे वाण असा गंध येण्यासाठी जबाबदार असलेल्या लाइपोक्सीजिनेज-2 एंजाईम मुक्त असल्याचे सांगण्यात आले. एनआरसी-152 हे वाण 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीत परिपक्व होते, असा दावा संस्थेने केला आहे. खाद्यान्न म्हणून उपयुक्त आणि अपौष्टिक क्लुनिटस, ट्रिप्सिंग इनहिबिटर आणि लाइपोक्सीजनेस एसिड-2 पासून देखील हे वाण मुक्त असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ जबलपूरद्वारा एक सोयाबीन वाण विकसित करण्यात आले असून हे वाण येलो मोझॅक, चारकोल रोट, बॅक्टेरियल पस्ट्यूल तसेच लीफ स्पॉट रोगांना प्रतिकारक असल्याची माहिती देण्यात आली. संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की देशभरात प्रत्येकी एक एकर क्षेत्र याप्रमाणे 1800 प्रथम रेषीय प्रात्याक्षीक घेण्यात आली.
हे ही वाचा : घरातच संपवलं आयुष्य, आईसह दोन लेकींची आत्महत्या, खोलीत सापडली सुसाईड नोट
या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत आधुनिक व्यवस्थापन पद्धती पोहोचविण्यात यश आले आहे. त्यासोबचत सोयाबीन प्रक्रिया उद्योगाला चालना मिळावी याकरिता देखील संस्था प्रयत्न करीत आहे. बैठकीच्या समारोपीय सत्रात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक संचालक (तेलवर्गीय पिके) डॉ. संजीव गुप्ता यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले, नव्या वाणांसोबतच उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करण्याचे तंत्रज्ञानही शेतकऱ्यांपर्यंत पोचणे काळाची गरज आहे. त्याकरिता संशोधक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.
या वेळी सोयाबीन संशोधन व विकास क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे डॉ. सुनील दत्त बिलोरे, आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ. फिलिप वर्गिस, आनंद कृषी महाविद्यालय गुजरातचे डॉ. जी. जे. पटेल, सीहोर कृषी महाविद्यालयाचे डॉ. रामगिरी यांना सन्मानित करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agriculture, Farmer, शेतकरी